दूध उत्पादकांच्या समस्या सोडविणार
By Admin | Updated: January 12, 2015 21:47 IST2015-01-12T21:39:13+5:302015-01-12T21:47:41+5:30
रणजीत देसाई : सिंधुदुर्गनगरीत दूध उत्पादक संस्थांची बैठक

दूध उत्पादकांच्या समस्या सोडविणार
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू झाले असून त्याचे चांगले चित्र जिल्ह्यात दिसू लागले आहे. मात्र, तरीही जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असून त्या गोकुळ आणि जिल्हा परिषद लक्ष घालून सोडवेल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी सिंधुदुर्गनगरी येथील दुग्ध उत्पादक संस्थांच्या बैठकीत दिली.
जिल्हा परिषद भवनातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व या संस्थांना बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने या बैठकीचे आयोजन केले होते. यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी ‘गोकुळ’चे व्यवस्थापक डॉ. मोजक, जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत, जिल्हा बँकेच्या संचालिका नीता राणे, सुगंधा साटम, संग्राम प्रभूगावकर, गोकुळचे तानाजी डोगळे, संस्था अध्यक्ष, सचिव, आदी उपस्थित होते.जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गोकुळबरोबरच जिल्हा परिषदही आपल्या योजना प्रभावीपणे राबवील, अशी ग्वाही रणजीत देसाई यांनी दिली. गोकुळचे नियम, निकष आणि योजनाही कोल्हापूर आणि अन्य भागांप्रमाणे सिंधुदुर्गसाठीही तशाच आहेत. यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल, तर ते प्रश्न सोडविण्यात येतील, असेही गोकुळचे व्यवस्थापक डॉ. मोगल यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू : सावंत
शेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादन वाढविताना त्याच्या दर्जाकडेही लक्ष द्यावे. दर्जा टिकविण्यास त्याला चांगला दरही मिळेल. जर दर्जा असतानाही दर मिळाला नाही, संकलनामध्ये दुधाची तूट आली आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर हे प्रश्न गोकुळमार्फत सोडविले जातील, असेही सतीश सावंत यांनी सांगितले.