समस्या सोडवा अन्यथा आंदोलन
By Admin | Updated: January 30, 2015 23:11 IST2015-01-30T23:09:56+5:302015-01-30T23:11:19+5:30
व्हिक्टर डान्टस : जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीचा मूक मोर्चा

समस्या सोडवा अन्यथा आंदोलन
सिंधुदुर्गनगरी : जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांविरोधात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन रेशनकार्ड, केशरी कार्डधारकांना धान्याचा तुटवडा, रॉकेल टंचाई, शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डान्टस यांनी दिला.शुक्रवारी सकाळी कृषीभवन येथे राष्ट्रवादीची बैठक झाली. त्यानंतर कृषीभवन ते जिल्हाधिकारी भवन असा मूक मोर्चा काढला. डान्टस यांच्यासह ज्येष्ठ नेते प्रवीण भोसले, सुरेश दळवी, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, प्रदेश युवक उपाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष राजू बेग, तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर, वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष डॉ. पूजा कर्पे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.
डान्टस म्हणाले की, युती सरकारने नोव्हेंबरपासून एपीएल कार्डधारकांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत देण्यात येणारे लाभ बंद केले आहेत. जिल्ह्यातील ४७ हजार ७३१ लोकांच्या तोंडचा घास पळविला आहे. ही योजना पुन्हा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा करावा. जिल्ह्यात १४४२ किलोलिटर रॉकेलची आवश्यकता असताना पुरवठा विभागाकडून जिल्ह्यासाठी केवळ ३३६ किलोलिटर म्हणजे मागणीच्या २३ टक्केच रॉकेल उपलब्ध होत आहे. प्रतीकुटुंब १० ऐवजी २ लिटर रॉकेल मिळत आहे. (प्रतिनिधी)