लवकरच वाळू उत्खननाचे परवाने
By Admin | Updated: May 29, 2015 23:46 IST2015-05-29T22:06:29+5:302015-05-29T23:46:11+5:30
विनायक राऊत : जांभ्या दगडाची बंदी उठविण्यात यश

लवकरच वाळू उत्खननाचे परवाने
मालवण : जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांचे दुर्लक्ष व निष्क्रियतेमुळे जिल्ह्यात वाळू व गौण खनिज बंदीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, कोकणात भगवा फडकला. देशासह राज्यात शिवसेना- भाजपची सत्ता आली त्या माध्यमातून हा
प्रश्न निकाली काढताना जांभ्या दगडासह वाळू उत्खननावरील बंदी उठविण्यात यश आले आहे. लवकरच शासन धोरणानुसार वाळू उत्खननाचे परवाने दिले जातील. जिल्हा प्रशासनाला त्वरित कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली.
कुंभारमाठ येथील शिवसेना आयोजित सामूहिक विवाह सोहळ््यानिमित्त खासदार राऊत बोलत होते. यावेळी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. हर्षद गावडे, संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, किरण वाळके, नंदू गवंडी, मंदार गावडे, सतीश प्रभू, सन्मेश परब, सेजल परब, तपस्वी मयेकर, गुरव, आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून गेले काही महिने हा प्रश्न सुटण्यासाठी केला जात असलेला पाठपुरावा व वरिष्ठ स्तरावर शिवसेना- भाजप मंत्रिमंडळाकडून विशेष महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे न्यायालयासह
हरित लवादाकडे असलेला प्रश्न यामुळे कोकण विभागातील वाळू
बंदी उठविण्यात आली. मेरिटाईम बोर्डाचे तांत्रिक मार्गदर्शन घेण्यात आले. याबरोबरच महसूल विभाग, हातपाटी, पारंपरिक व डुबी
या खाडीपात्रातील वाळू उत्खननास परवानगी देताना पूर्वीप्रमाणे उत्खनन होणार आहे. जिल्ह्यात शिल्लक राहिलेला कालावधी वाळू उत्खननास मिळावा याबाबतही कार्यवाही सुरू असून, जिल्हाधिकाऱ्यांना त्या प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत.
खनिकर्म विभागामार्फत वाळू लिलाव झाल्यानंतर खाडीपात्रानजीक रस्त्यावरून होणाऱ्या वाळू डंपर वाहतुकीमुळे खाडीकिनारी असलेले रस्ते नादुरुस्त बनतात. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन वाळू लिलावातून मिळणारी काही रक्कम ग्रामपंचायतींना रस्ते दुरुस्तीसाठी मिळणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
काँगे्रसचे आंदोलन म्हणजे पुतणामावशीचे बेगडी प्रेम
जिल्हाभरात काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या शासकीय भात गोडावून आंदोलनाची विनायक राऊत यांनी खिल्ली उडविली.
शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन त्यांच्या भाताची खरेदी करण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात आला आहे.
गोडावून खाली नसतील तर खासगी ठिकाणी भात खरेदीसाठी जागा निश्चित केली आहे.
खरेदी-विक्री संघांना त्यासाठी हुंडी देऊन तसा करार करून भात खरेदी केली जाईल, असे असताना काँग्रेसचे आंदोलन म्हणजे पुतणामावशीचे बेगडी प्रेम आहे, अशी टीका केली.