सुशिक्षितांचा निर्लज्जपणा

By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T22:54:25+5:302015-07-25T01:13:30+5:30

कोकण किनारा

The shamelessness of educators | सुशिक्षितांचा निर्लज्जपणा

सुशिक्षितांचा निर्लज्जपणा

महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या बाथरूममध्ये वेब कॅमेरा सोडून चित्रिकरण करणाऱ्या प्राध्यापकाला ग्रामस्थांकडून चोप...
विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा प्राध्यापक निलंबित...गेल्या आठवडाभरात घडलेल्या या दोन घटनांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रच नाही तर सामाजिक क्षेत्रही ढवळून निघाले आहे. दोन्ही घटना सुशिक्षित लोकांमध्येच घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये ज्यांच्याकडे पुराव्यासह संशयाने पाहिले जात आहे, ते दोघेही प्राध्यापक आहेत. शिक्षकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन आजही आदराचाच आहे. आपल्या मुलाला/मुलीला शिकवणाऱ्या शिक्षकांना पालक खूप मान देतात. या क्षेत्राला पूर्वीपासून एक रूबाब आहे. पण दुर्दैवाने आज हा रूबाब राहिला आहे का, असा प्रश्न पडावा, अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत. सहा महिन्यापूर्वीच लहान मुलींशी विकृत चाळे करणाऱ्या गुहागरातील एका शिक्षकाविरूद्ध अशीच कारवाई झाली आहे. बदलीसाठी खोटे दाखले देणे, आपली पदवीची कागदपत्रेच खोटी सादर करणे अशा गोष्टी शिक्षकांकडून होणं ही बाबही अतिशय गंभीर आहे आणि अशा वारंवार घडणाऱ्या घटनांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या नावलौकिकाला काळीमा फासला गेला आहे.
विद्यार्थिनीकडून आलेल्या तक्रारीमुळे दापोली कृषी विद्यापीठातील एका प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाला अनेक कोन असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आपल्याकडे सर्वात स्वस्त गोष्ट कुठली असेल तर ती स्त्रीचे चारित्र्य. कसलीही कल्पना नसताना अनेकजण स्त्रियांच्या चारित्र्यावर बिनधास्त बोलून मोकळे होतात. पण खरं तर कुठलीही विद्यार्थिनी किंवा महिला अशा प्रकरणात स्वत:वर चिखल उडवून घेणार नाही. तथ्य नसलेल्या गोष्टी समाजासमोर आणून स्वत:लाच बदनाम करून घेण्याची कोणाचीही मानसिकता नसते. त्यामुळे मुळात अशा प्रकरणांमध्ये तक्रार करणाऱ्या मुली/महिला पुढे येतात, तेव्हा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक संरक्षणासाठी समाजाने पुढे येणे गरजेचे असते. चार सामाजिक संस्था आणि राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे म्हणजे समाजाने पाठीशी उभे राहाणे होत नाही. उद्या जेव्हा ती विद्यार्थिनी रस्त्यावरून जाईल, तेव्हा तिच्याकडे सर्वसामान्य नजरेने पाहणे किंवा तिच्याविषयी कुजबूज न करणे याला समाजाचा पाठिंबा म्हणतात. ही बाब कुठल्याही समाजात खूप दुर्मीळपणे आढळते. जी महिला किंवा जी मुलगी आपल्यावरील शारीरिक अत्याचाराच्याविरोधात आवाज उठवते तेव्हा ती आणि तिचे कुटुंब आरोपीपेक्षा समाजालाच अधिक घाबरते. उद्या याच समाजात वावरायचे आहे, या एका वाक्यासाठी अनेक प्रकरणे पोलीस स्थानकापर्यंत जातही नाहीत. त्यामुळेच समाजाने अशा पीडित मुलीला/महिलेला सामाजिक आधार देण्याची गरज आहे.
गुहागरमधील प्रकरण त्याहून वेगळे आहे. त्या प्राध्यापकाला विकृतच म्हणावे लागेल. त्याने केलेली गोष्ट कुठल्याच बाजूने समर्थनीय होऊ शकत नाही. बाथरूममधील छायाचित्रण करणे ही बाबच मुळात निर्लज्जपणाची आहे. हा प्राध्यापक विवाहीत आहे. पत्नी गावाला गेल्याची संधी साधून त्याने हा प्रकार केला. आपण शिक्षक आहोत, समाज आपल्याकडे आदर्श म्हणून पाहतो, याचे भानही त्याने दाखवले नाही. आपली नोकरी ही केवळ पोट भरण्याची नोकरी नाही, ती खूप मानाची नोकरी आहे, आपण हजारो मुलांवर संस्कार करतो आणि हजारो मुले आपल्याकडे बघून संस्कार घेत असतात, ही शिक्षकांमधील भावना नष्ट होत आहे की काय, असे वातावरण सध्या दिसते.
मुले पाच-सहा तास आमच्या ताब्यात असतात. उर्वरित वेळ ती पालकांसोबत असतात. त्यामुळे मुलांवर जास्त संस्कार पालकांचेच होतात. त्यासाठी शिक्षकाला जबाबदार धरायचे कारण काय, असा प्रतिवाद (किंवा पळवाट) शिक्षकांकडून केला जातो. काहीअंशी ही बाब खरीही आहे. पण म्हणून शिक्षकांना आपल्या जबाबदारीपासून पळता येणार नाही. स्टाफ रूममध्ये विद्यार्थी शंका विचारायला आल्यानंतर प्राध्यापक किंवा शिक्षकाने गुटखा किंवा तंबाखू खात त्यांच्याशी बोलणे हे कधीच शिष्टाचाराला धरून होत नाही. शाळा असो किंवा महाविद्यालय, आज प्रत्येक वर्गात मुलांची संख्या इतकी असते की, शिक्षक/प्राध्यापक प्रत्येक मुलाला वैयक्तिकरित्या ओळखू शकत नाहीत. पण मुले आपल्या शिक्षक / प्राध्यापकांना ओळखतात. त्यांच्यावर शिक्षक / प्राध्यापकांचा पगडाही तेवढाच असतो. पालकांपेक्षा शिक्षक / प्राध्यापकांवर मुलांचा विश्वास अधिक असतो. याचे भान आता संपत चालले आहे, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. सरकारी कार्यालयातील कर्मचारी जेवढ्या निरीच्छ बुद्धीने काम करतात, तेवढ्याच निरूत्साहाने प्राध्यापक, शिक्षकांनी शिकवण्याचे काम करावे, असे अपेक्षित नाही. पण शिकवणे हाही आता धंदा होऊ लागला आहे. काही तासांची नोकरी एवढाच त्याचा अर्थ उरला आहे. अत्यंत कमी शिक्षक आदर्श वागतात. पण अनेक शिक्षक गावच्या राजकारणात आपलीच प्रमुख भूमिका आहे, अशा थाटात वागतात. शिकवण्यापेक्षा इतर गोष्टीतच शिक्षकांना रस अधिक असतो, असे चित्र अनेक ठिकाणी दिसते. शिक्षक हा माणूसच आहे आणि त्यालाही सामाजिक आयुष्य आहे. पण ते वहावलेले असू नये. अलिकडच्या काळात हीच वृत्ती जास्तवेळा दिसते. एखादा प्राध्यापक, प्राचार्य मद्याच्या नशेत रस्त्यात पडलेला दिसणे कुठल्याही समाजासाठी धोकादायकच. उद्या कुणाच्या भरवशावर पालकांनी आपली मुले अशा शिक्षकांच्या ताब्यात द्यायची, हा प्रश्न येतोच.
या दोन घटनांमुळे सगळे शिक्षक / प्राध्यापक वाईट आहेत, अशातला भाग नाही. कदाचित वाईट घटनांमधल्या शिक्षकांच्या बातम्या प्राधान्याने येतात. तशा चांगले काम करणाऱ्यांचे विषय पुढे येत नसावेत. पण जे विषय पुढे येतात, ते समाजविघातक आहेत. त्यातून एकूणच शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. खरं तर शिक्षकच नाही तर समाजातल्या प्रत्येक पेशातील लोकांनी जबाबदारीनं आपल्या पदाचा, क्षेत्राचा मान राखून जगायला हवं. पत्रकारिता असो, वकिली क्षेत्र असो, पोलीस असोत किंवा एखादा सरकारी अधिकारी असो. सर्वांनीच आपल्या पदाचा मर्यादा आणि आपले सामाजिक वर्तन याचा विचार करायला हवा. पण अलिकडच्या काळात सुशिक्षितांमधला निर्लज्जपणा वाढत चालला आहे. आजकाल सुशिक्षितांना कुप्रसिद्धीची लाज वाटत नाही आणि हेच स्थिर समाजासाठी घातक आहे.---- मनोज मुळ््ये

Web Title: The shamelessness of educators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.