सरकारी भात शिजता शिजेना!
By Admin | Updated: January 25, 2015 00:51 IST2015-01-25T00:51:50+5:302015-01-25T00:51:50+5:30
खरेदी-विक्री संघांची गोडाऊन भरली : जिल्ह्यातील १६ गोदामांमध्ये तीन कोटींहून अधिक किंमतीचा भात पडून

सरकारी भात शिजता शिजेना!
मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरी
रत्नागिरी : दि महाराष्ट्र स्टेट को. आॅप. मार्केटिंग फेडरेशने गतवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून २४ हजार ४९८.४६ मेट्रीक टन भात संकलन केले होते. सुमारे तीन कोटी २0 लाख रूपयांहून अधिक किंमतीचे हे भात भात तालुका खरेदी-विक्री केंद्रामध्ये अद्याप पडून असतानाही, चालू वर्षी भात संकलन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. हे आदेश जारी करण्यात आले असले, तरी गतवर्षीच्या संकलित करण्यात आलेल्या भात साठवणुकीमध्येच गोडाऊनची क्षमता संपल्याने खरेदी-विक्री संघांनी यावर्षी भात संकलन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
गतवर्षी फेडरेशनकडून जिल्ह्यातील एकूण १६ खरेदी विक्री संघातर्फे १९५९ शेतकऱ्यांकडून २४४९८.४६ मेट्रीक टन भात खरेदी केले होते. सर्वसाधारण भातासाठी टनाला १३१० रूपये दर व २०० रूपये बोनस देण्यात आला होता, तर ‘अ’ वर्गाकरीता १३४५ रूपये दर देण्यात आला. त्यामुळे खरेदी-विक्री संघांच्या गोडाऊनमध्ये पडून असलेल्या भाताची किंमत ३ कोटी २० लाख ९२ हजार ९८२ रूपये इतकी आहे. एवढ्या किंमतीचे भात पडून असतानाही, शासनाने चालूवर्षी भात खरेदी करण्याचा आदेश दिल्याने खरेदीविक्री संघ चालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
संकलित केलेले भात तसेच पडून असल्याने, त्याच्या वजनात घट होण्याची शक्यता तर आहेच, शिवाय दमट हवामानामुळे भातावर प्रक्रिया केली गेली, तर त्या भाताचा जास्तच तुकडा पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबंधित व्यवहारात शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले असले तरी शासनाचे नुकसान झाले आहे. शिवाय शिल्लक भातामुळे गोडाऊनची क्षमता संपून गेली आहे. त्यामुळे, नवीन भात संकलन करून ठेवायचे कोठे, हा खरेदी विक्री संघांसमोरील मोठा प्रश्न आहे.
संकलित केलेले भात तसेच पडून असले, तरी भाताच्या खरेदीसंदर्भात सूचना करण्यात आल्याने याबाबत विशेष लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे. या ठिकाणी असलेले भात व गोडाऊनमध्ये साठवण करण्याची व्यवस्था या दोन्हीबाबत नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण होणार असल्याचे एकंदर सर्व स्थितीवरून स्पष्ट होत आहे.
वजनात घट होण्याची शक्यता
फेडरेशनच्या माध्यमातून भात संकलन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते प्रोसेसिंग मीलला पाठविण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यात प्रोसेसिंग मिलचा अभाव असल्याने कोल्हापूर किंवा रायगड जिल्ह्यात पाठविण्यात येते. अखंड तांदूळ अपेक्षित असल्याने संबंधित तांदूळ जिल्ह्यातील रेशनकार्डावर विक्रीस पाठविण्यात येतो. गतवर्षीच्या भातावर प्रक्रिया करताना वजनात घट होण्याबरोबरच तांदळाचा तुकडा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय दर्जाबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे
ई-टेंडर प्रणालीचा अवलंब
राज्य शासनाने ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील दि महाराष्ट्र स्टेट को आॅप. मार्केटिंग फेडरेशन लि.व्दारे गतवर्षी (२०१३-१४) खरेदी करण्यात आलेल्या भातासाठी ई-टेंडर प्र्रणालीचा अवलंब करून प्रोसेसिंगकरिता पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ई-टेंडर प्रणाली अवलंबिण्यात येणार आहे. त्यामुळे, गतवर्षीचे गोडाऊनमध्ये संकलित करून ठेवण्यात आलेल्या भातावर लवकरच प्रक्रिया होण्याची शक्यता आहे
जिल्ह्यास २७ हजार
मेट्रीकटनचे उद्दिष्ट
यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यास भात खरेदीसाठी २७ हजार मेट्रीकटनचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षी २५ हजाराचे लक्ष्यांक असताना २४ हजार ४९८.४६ मेट्रीकटन भात संकलन करण्यात आले होते. यावर्षी सर्वसाधारण भातासाठी टनाकरिता १३६० रूपये, तर ‘अ’ वर्गासाठी १४०० रूपये दर देण्यात येणार आहे. मात्र गोडाऊनची साठवणूक क्षमता नसल्यामुळे संघानी खरेदीसाठी असमर्थता दर्शविली आहे...
जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर गतवर्षी खरेदी केलेले व गोडावूनमध्ये शिल्लक असलेले भात
खरेदी शेतकरी भात
केंद्र संख्या (मे.टन)
खेड २७५ ४५३०
दापोली १११ ९५३.६०
केळशी १५३ १०७७.०१
गुहागर १९७ १६५९.६०
रत्नागिरी १२२ ११०५.६०
संगमेश्वर १७२ ५०७.६०
लांजा १८ १२८.४०
राजापूर १२८ १९९४.४०
पाचल ९३ ११५६.८०
चिपळूण ११८ २१६८.८०
निवळी ३१ ५६०.४०
मिरवणे १२५ २०२१.२०
आकले ४१ ४४३.६०
शिरगांव १९० १७८०.४०
शिरळ ११३ १५०१.१०
देवरूख ७२ ९०९.९५
एकूण १९५९ ४४९८.४६