नौकानयन स्पर्धेने पर्यटन महोत्सवात रंगत
By Admin | Updated: May 4, 2015 00:39 IST2015-05-04T00:38:30+5:302015-05-04T00:39:00+5:30
स्पर्धेत १७ संघांचा सहभाग

नौकानयन स्पर्धेने पर्यटन महोत्सवात रंगत
रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन महोत्सवानिमित्त शहरानजीकच्या कर्ला परिसरातील समुद्रात आयोजित केलेल्या चुरशीच्या नौकानयन स्पर्धेने महोत्सवाला रंगत आणली. यात एकूण १७ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत कर्ला येथील शकील वस्ता यांचा संघ विजेता ठरला.
पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त एन. व्ही. भादुले, माहिती अधिकारी संजय देशमुख उपस्थित होते.
कर्ला जेटी ते भाट्ये येथील सागरी किनारपट्टी संशोधन केंद्रापर्यंत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला मच्छिमार बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेत फणसोप येथील तलाठी मीनाक्षी कदम यांनी हौशी स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत प्रथम क्रमांक शकील बस्ता (कर्ला) यांच्या संघाने, तर द्वितीय क्रमांक मकबुल फणसोपकर (राजिवडा) तृतीय क्रमांक मोहम्मद डोंगरकर (कर्ला) या संघाने पटकावला. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक मोहम्मद मिरकर (भाट्ये), बिलाल सोलकर (कर्ला), मिलाद सोलकर (कर्ला), सईद गडकरी (कर्ला) यांना मिळाले.
यावेळी उपस्थित नागरिक आणि पर्यटकांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवला. (प्रतिनिधी)