दोडामार्ग शहरात रस्त्यांचे बनले तळे
By Admin | Updated: July 7, 2015 20:58 IST2015-07-07T20:58:37+5:302015-07-07T20:58:37+5:30
बांधकाम विभागाचा गलथान कारभार : ग्रामस्थांतून तीव्र संताप

दोडामार्ग शहरात रस्त्यांचे बनले तळे
दोडामार्ग : पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा, रस्त्यांची दुरवस्था होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोडामार्ग शहरात गटार खोदले खरे; परंतु ते अर्धवट स्थितीत ठेवल्याने गटारातील पाणी रस्त्यावरच येऊन रस्त्यांनाच तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचा फटका पादचारी आणि दुचाकीस्वारांना बसत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दोडामार्ग शहरातील कोलमडलेली गटार व्यवस्था नेहमीच शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरली आहे. ग्रामपंचायत व्यवस्थापन आणि बांधकाम विभाग यांच्यात समन्वय नसल्याने शहरातील गटार व्यवस्थेचे दरवर्षी तीनतेरा वाजतात. गटारांची साफसफाई करावी तरी कोणी? असा प्रश्न ग्रामपंचायत आणि बांधकाम विभागाच्या वादामुळे नेहमीच निर्माण होतो. मात्र, चालूवर्षी ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच संंतोष नानचे यांनी बांधकाम विभागाची चांगलीच कानउघडणी केल्यानंतर गटार साफसफाईच्या कामास सुरुवात झाली.
दरम्यान, पावसाने सुरुवात केल्याने गटारातील पाणी पुन्हा एकदा दूरध्वनी केंद्रासमोरील रस्त्यावर येत असल्याने याठिकाणी पाण्याची तळी साचून आहेत. त्याचा फटका पादचारी, रस्त्याने चालत जाणारे शाळकरी विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना बसत आहे.
एखादे मोठे वाहन गेल्यास रस्त्यावरील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडते आणि त्यांना नाहक भिजावे लागते. यामुळे या रस्त्यांवर वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणाचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे.
गटार खुदाईचे काम अर्धवट
बाजारपेठेतील गटारांची पावसाळ्यापूर्वीच साफसफाई करण्यात आली. मात्र, दोडामार्ग-आयी व दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गाच्या दुतर्फा शहर हद्दीत येणाऱ्या गटारांची खुदाई करण्याचे काम राहून गेले होते.
आठ-दहा दिवसांपूर्वीच हे काम हाती घेण्यात आले.
जेसीबी मशीनच्या सहाय्याने दोडामार्ग-आयी राज्यमार्गाच्या दुतर्फा गटार खुदाई करण्यात आली.
येथील दूरध्वनी केंद्र ते धाटवाडीपर्यंत गटार खुदाई झाल्यानंतर गटार खुदाईचे काम संबंधितांकडून अर्धवट सोडून देण्यात आले.