देवगड (सिंधुदुर्ग) : देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे रिक्षा आणि एसटी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्षा व्यावसायिकांचा समावेश आहे. मृतांमध्ये संकेत सदानंद घाडी (३५, रा. आचरा वरचीवाडी), संतोष रामजी गावकर (३५, रा. आचरा गाऊडवाडी), रोहन मोहन नाईक (३५, रा. आचरा गाऊडवाडी) आणि सोनू कोळंबकर (४५, रा. आचरा पिरावाडी) या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातात रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी गोवा येथील बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विजयदुर्ग-मालवण मार्गावर धावणारी एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. ज्यामुळे रिक्षातील प्रवाशांचे प्राण तत्काळ गेले.
अपघातग्रस्त रिक्षातील प्रवासी आचरा येथे येऊन रस पिऊन पुन्हा प्रवासाला निघाले होते. मात्र, त्यांचा मृत्यू अटळ ठरला. विशेष दुःखाची बाब म्हणजे संकेत घाडी यांनी केवळ १५ दिवसांपूर्वी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.