जनता उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी सज्ज
By Admin | Updated: November 22, 2014 00:13 IST2014-11-21T22:38:31+5:302014-11-22T00:13:09+5:30
वैभव नाईक : मालवण येथे दौऱ्याबाबत दिली माहिती

जनता उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी सज्ज
मालवण : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही कोकणवासीयांनी शिवसेनेला भरघोस यश देऊन येथील जनतेने शिवसेनेच्या पाठीशी आपण असल्याचे दाखवून दिले आहे. आणि म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २२ व २३ नोव्हेंबर या दोन दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे सिंधुदुर्गातील शिवसेनेत नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे. शिवसेनेबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन शिवसेना आमदार आणि सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी येथे बोलताना केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २२ व २३ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या नियोजनाच्या पूर्वतयारीसाठी आमदार वैभव नाईक हे शुक्रवारी मालवण येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना मालवण तालुकाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख नंदू गवंडी, राजा गावकर, महेश शिरपुटे, सतीश प्रभू आदी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना आमदार नाईक म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा दौरा कौटुंबिक स्वरूपाचा असून विधानसभा निवडणुकीत कोकणवासियांनी शिवसेनेला जे यश दिले त्या यशाबद्दल जनतेचे ऋण मानण्यासाठी ठाकरे हे दौऱ्यावर येत असल्याचे सांगून नाईक म्हणाले, शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता आचरा येथे तर सायंकाळी ६ वाजता मालवण येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागत होणार आहे. ठाकरे यांच्यासमवेत खासदार विनायक राऊत तसेच कोकणातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
नाईक म्हणाले, या दौऱ्यात ठाकरे हे समाजातील विविध घटकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने मालवणातील स्कुबा डायव्हींग व्यावसायिकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजावून घेणार आहेत. यानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेट देऊन पर्यटनाच्यादृष्टीने सिंधुदुर्ग किल्ल्याचा विकास कसा करता येईल, यादृष्टीने पाहणी करणार
आहेत. (प्रतिनिधी)