रत्नागिरी विभागात फुकट्या प्रवाशांवर टाच
By Admin | Updated: December 1, 2014 00:05 IST2014-11-30T22:46:23+5:302014-12-01T00:05:20+5:30
एस. टी. प्रशासन : गेल्या दहा महिन्यात साडेएकतीस हजार रुपयांचा दंड वसूल

रत्नागिरी विभागात फुकट्या प्रवाशांवर टाच
रत्नागिरी : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ब्रीदवाक्य असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा ग्रामीण भागातील वाडीवस्तीवर पोहोचली आहे. ग्रामीण भागाची जीवन वाहिनी ठरलेल्या एस. टी.चा दररोज २ लाख १६ हजार किलोमीटर इतका प्रवास होतो. तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांबरोबर फुकट प्रवास करणारीही मंडळी आहेत. परंतु त्याचे प्रमाण कोकणात अल्प आहे. गेल्या दहा महिन्यात १३९ फुकट्या प्रवाशांवर महामंडळाने कारवाई केली असून, त्यांच्याकडून ३१ हजार ७८४ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रत्नागिरी विभागात एस. टी.च्या ७९० गाड्या असून, त्यामध्ये लवकरच नवीन १०० गाड्यांची भर पडणार आहे. दररोज ४५०० फेऱ्यांव्दारे २ लाख १६ हजार किलोमीटर प्रवास होतो. दररोज एकूण ५० हजार लीटर डिझेल लागते. त्यासाठी किमान ३०,१५,५०० रूपये खर्च येतो. प्रतिदिन विभागाला ६५ लाख रूपये खर्च येतो. विभागात १४७३ चालक, १६०० वाहक असून सध्या २४० चालक प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण सुरू आहे. जानेवारी ते आॅक्टोबर अखेर १३९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. दरमहा ५ ते १७ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३१ हजार ७८४ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रत्नागिरी विभागाचे पूर्वी प्रतिदिन ५० लाखांपर्यंत उत्पन्न होते. परंतु यावर्षी ६५ लाख इतके झाले आहे. अनेक ठिकाणी सुमारे ५० हून अधिक जादा गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, निवडणूक, तसेच उन्हाळी सुटीचे योग्य नियोजन करण्यात आल्याने विभागाला नुकतीच ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. विनाअपघात सेवा, स्वच्छ व सुंदर गाड्या या योजना राबवण्यात आल्या आहेत. आता ‘मागेल त्याला एस. टी.’ अभिनव योजना राबविण्यात येणार आहे. प्रवासी वाहतूकीदरम्यान इंधन, वंगण बचतीबरोबर चालक, वाहकांचा ओव्हरटाईम कमी आहे. शिवाय फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही खास पथकाव्दारे सतत तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)
एस. टी.तून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करताना १०० रूपयांच्या आत तिकीट असेल तर १०० रूपये दंड व तिकिटाची रक्कम वसूल केली जाते, तर १०० रूपयांच्या वर तिकीट दर असेल तर तिकीट दर व तिकीटाच्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम वसूल केली जाते. रत्नागिरी विभागात फुकट तिकीट करणाऱ्यांची संख्या मात्र अल्प आहे.
- के. बी. देशमुख,
विभाग नियंत्रक, रत्नागिरी विभाग
महिनेप्रवासी दंडाची
संख्यारक्कम
जानेवारी१११५३७
फेब्रुवारी१७२८४४
मार्च९२६४१
एप्रिल१०४३२६
मे१७३६३९
जून५६५०९
जुलै७३५९७
आॅगस्ट१३३३३३
सप्टेंबर५१८५०
आॅक्टोबर७१५०८