पावसाचा टक्का घसरला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 23:14 IST2015-08-26T23:14:44+5:302015-08-26T23:14:44+5:30

शेतकरी हताश : यंदा पाणी टंचाईचे संकट भीषण?

Rainfall declined ... | पावसाचा टक्का घसरला...

पावसाचा टक्का घसरला...

रत्नागिरी : पावसाळ्याच्या चार महिन्यांतील तीन महिने संपत आले आहेत. या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानाचा टक्का खुपच घसरला आहे. जिल्ह्यात जेमतेम पन्नास टक्के पाऊस झाला असून उरलेल्या एक महिन्याच्या काळात पाऊस पन्नास टक्क्यांचा उर्वरित कोटा भरून काढणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. पिवळे पडल्याने भातपिकाचे नुकसान झाले आहेच, परंतु पुरेसा पाऊस न झाल्यास डिसेंबरमध्येच जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला. परंतु त्यानंतर पावसाने आठवडाभर दांडी मारल्याने शेतीचे भवितव्य धोक्यात आले. पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे लावणी केलेले भात रोपांनी पुन्हा बाळसे धरले. आता पीक चांगले येईल, अशी आशा धरून बसलेल्या शेतकऱ्यांना पावसाने पुन्हा दगाच दिला. गेल्या दोन महिन्यांच्या काळात पाऊस गायबच आहे. कधीतरी एखादी सर आली तर आली, अशी स्थिती आहे.
आॅगस्ट हा पावसाचा तिसरा महिना संपायला आला, तरी पावसाचे दमदार आगमन अद्यापही झालेले नाही. भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पाण्याच्या अभावाने शेत पिवळे पडले आहे. येत्या आठवडाभरात दमदार पावसाचे आगमन झाले नाही तर मात्र शेती करपण्याची शक्यता आहे. एकुणच पावसाच्या लहरीपणामुळे यंदा भातपीक ५० टक्के तरी हाती येईल का, याबाबात साशंकता व्यक्त होत आहे.
पावसाने दांडी मारल्याने शेतीचे नुकसान होणार हे स्पष्ट झालेले असतानाच या महिनाभरात पावसाने आपला उर्वरित कोटा पूर्ण न केल्यास नोव्हेंबर, डिसेंबरपासून भीषण पाणी टंचाईचे सावटही जिल्ह्यासमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.
आधीच साडेतीन हजार ते चार हजार जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान असताना यावर्षी सुमारे तीन महिन्यात केवळ १८०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे साडेतीन ते चार हजार सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण पन्नास टक्के एवढेच आहे. येत्या आठवडाभरात पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात होईल व पावसाचा राहिलेला कोटाही पूर्ण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे हा अंदाज खरा ठरला तर पाणीसंकट टळेल. मात्र, तसे झाले नाही तर डिसेंबरपासूनच भीषण पाणी टंचाईला जिल्ह्यास सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत
आहे.
मंगळवारी रात्रीपासून शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, बुधवारी दिवसभर वातावरण स्वच्छ होते. त्यामुळे पुन्हा गरमीला सुरुवात झाली. हुलकावणी देणाऱ्या पावसामुळे उभारणीला येत असलेली लावणी पुन्हा सुकण्याच्या स्थितीत आली असून, शेतकरी चिंतेत सापडला आहे. (प्रतिनिधी)


पाणीटंचाईचे सावट !
राज्यातील केवळ नागपूर व अमरावती या दोन जिल्ह्यांतच शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. कोकणातील रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेऊन पाणी आरक्षणाचा निर्णय झाला असून, केंद्रानेही राज्याला मदत दिली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात पावसाची टक्केवारी वाढली नाही तर डिसेंबरपासूनच पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला असून त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.


हवामान खात्याचा
अंदाज खरा ठरणार?
येत्या आठवडाभरात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होईल व राज्यात कोकणसह सर्वत्र मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पन्नास टक्के पर्जन्यमान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात या अंदाजानुसार मुसळधार पाऊस पडेल काय, असा सवाल निर्माण झाला आहे.

Web Title: Rainfall declined ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.