पं. राम मराठे संगीत स्पर्धेत चैतन्य परबची बाजी
By Admin | Updated: January 29, 2015 23:34 IST2015-01-29T21:53:14+5:302015-01-29T23:34:31+5:30
रत्नागिरीचा ठसा : संजीव अभ्यंकर यांच्याहस्ते बक्षीस वितरण

पं. राम मराठे संगीत स्पर्धेत चैतन्य परबची बाजी
रत्नागिरी : पुण्यातील श्रीरंग कला निकेतनतर्फे आयोजित संगीतभूषण कै. पं. राम मराठे स्मृती संगीत राज्यस्तरीय स्पर्धेत शास्त्रीय गायनात चैतन्य परब याने प्रथम क्रमांक, तर सुगम संगीतात लहान गटात तृतीय क्रमांक मिळवत दुहेरी मुकुट पटकावला आहे. रत्नागिरीच्या ईशानी पाटणकर व रवींद्र सप्रे यांनीही सुयश प्राप्त केले आहे. विजेत्यांना प्रसिद्ध शास्त्रीय गायक संजीव अभ्यंकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.या राज्यस्तरीय स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला. चैतन्य परब याने शास्त्रीय गायन स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याने विलंबित एकतालमध्ये यमन राग सादर केला तर ‘काहे सखी कहे सखीकार’ बंदिश, तर ‘शाम बजाये आज मुरलिया’ ही द्रुत बंदिश सादर करून परीक्षकांची मने जिंकली. याचबरोबर सुगम संगीत प्रकारात लहान गटात तृतीय क्रमांक पटकावला आहे. यामध्ये त्याने ‘विसावा विठ्ठल’ हा अभंग सादर केला.
रत्नागिरीच्याच ईशानी मनोज पाटणकर हिने नाट्यसंगीत प्रकारात लहान गटात उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. तिने ‘वद जाऊ कुणाला शरण’ हे नाट्यपद सादर केले. याचबरोबर रत्नागिरीच्याच रवींद्र सप्रे यांनी ज्येष्ठ वयोगटामध्ये सुगम संगीत प्रकारात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेचे यंदाचे ३०वे वर्ष होते. नुकतीच या स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यामध्ये पार पडली.
या स्पर्धेत गोवा, रत्नागिरी, पुणे, सांगली, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आदींसह १२ केंद्रांतील स्पर्धकांची पुण्यामध्ये तळेगाव-दाभाडे येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. प्रत्येक संगीत प्रकारात एकूण ३६ स्पर्धकांतून विजेत्यांची निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)