दहा हजार सुकन्यांची समृद्धी
By Admin | Updated: May 29, 2015 00:08 IST2015-05-28T22:22:01+5:302015-05-29T00:08:11+5:30
भारतीय टपाल खाते : जिल्ह्यात मिळतोय उत्तम प्रतिसाद

दहा हजार सुकन्यांची समृद्धी
रत्नागिरी : भारतीय टपाल खात्याने ० ते १० वर्षांच्या आतील बालिकांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या ‘सुकन्या समृद्धी’ अल्पबचत योजनेला जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. केवळ चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल १०,५०० बालिका या योजनेचा लाभ घेत आहेत.बालिकांच्या कल्याणासाठी भारतीय टपाल खात्यातर्फे २२ जानेवारीपासून ‘सुकन्या समृद्धी खाते’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ १ ते १० वर्षांच्या आतील बालिकांना मिळतो. योजनेची सुरूवात म्हणून एक वर्ष विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार यावर्षीच फक्त २ डिसेंबर २००३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलीच्या नावे हे खाते खोलता येणार आहे. सुरुवातीला १००० रूपये भरून खाते उघडता येईल. एका आर्थिक वर्षात कमीत कमी १००० रूपये किंवा जास्तीत जास्त १,५०,००० एवढी गुुंतवणूक करता येईल.
खाते उघडल्याच्या तारखेपासून चौदा वर्षे होईपर्यंत या खात्यात पैसे भरावे लागतील. आर्थिक वर्षात किमान १००० रूपये जमा न झाल्यास खाते अनियमित होईल. मात्र, असे झाले तरीही ५० रूपये भरून खाते पुनरूज्जीवित करता येते. तसेच ही गुंतवणूक कर कपातीसाठीही पात्र धरण्यात येणार आहे. यासाठी नामनिर्देशनची आवश्यकता भासणार नाही. मात्र, या योजनेचा दोन मुलींसाठीच घेता येणार आहे. या गुंतवणुकीवर ९.२ टक्के इतक व्याजदरही मिळणार आहे.
‘सुकन्या समृद्धी खाते’ या योजनेचा लाभ सामान्य पालकांना घेता येणे शक्य आहे. तसेच हे खाते एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरीत करणेही सहज शक्य आहे. मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उच्चत्तम शिक्षण आणि विवाह यासाठी ५० टक्के रक्कम काढता येईल, तसेच २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खाते बंद करता येईल.
१० वर्षांपर्यंतच्या बालिकांसाठी अतिशय उत्तम अशी ही योजना असल्याने आता जिल्ह्यातून याला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजे केवळ चार महिन्यातच १०,५०० बालिका या योजनेचा लाभ घेत आहेत. यापुढेही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक पालकांनी पुढे यावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक बी. आर. सुतार यांनी केले आहे. देशात या योजनेसाठी बरेच प्रयत्न सुरू झाले असून अनेक ठिकाणी विशेष मोहीम राबविली जात आहे. देशभरात या योजनेला प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)