आचऱ्यातील घटनेचा ग्रामस्थांकडून निषेध
By Admin | Updated: November 2, 2015 00:23 IST2015-11-01T22:25:17+5:302015-11-02T00:23:36+5:30
व्यापारी सोमवारी बाजारपेठ बंद ठेवून निषेध करणार

आचऱ्यातील घटनेचा ग्रामस्थांकडून निषेध
आचरा : आचरा पारंपरिक मच्छिमार व पर्ससीनधारक यांच्यात वादाचा उद्रेक होऊन शनिवारी त्याचे राड्यात रुपांतर झाले. या घटनेप्रकरणी आचरा ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला. तसेच पत्रकारांवरील हल्ला प्रकरणाचा आचरा येथील व्यापारी सोमवारी बाजारपेठ बंद ठेवून निषेध करणार आहेत.
शनिवारी सायंकाळी घडलेल्या राड्याचा आचरा सर्वपक्षीय ग्रामस्थांनी निषेध करत आचरा पोलीस व आचरा पत्रकार यांना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध केला व आचरा पोलिसांना पाठिंबा दर्शविला. अशा प्रकारची घटना आचऱ्यात घडली नव्हती. यापुढे घडता कामा नये जर तसा प्रयत्न झाल्यास आचरावासीय जशास तसे उत्तर देतील असा इशारा आचरावासीयांनी दिला. यावेळी सरपंच मंगेश टेमकर, राजन गावकर, अशोक गावकर, श्रीकांत सांबारी, जेरोन फर्नांडिस, जगदीश पांगे, विजय कदम, छोटू पांगे, चंदन पांगे, अभिजीत सावंत, विद्यानंद परब, श्याम घाडी, धोंडी चिंदरकर, संतोष कोदे आदी उपस्थित होते.
शनिवारी बाहेरच्या मच्छिमारांनी आचऱ्यात घुसून केलेला राडा व त्यात पोलीस, पत्रकारांना झालेल्या मारहाणीच्या निषेध म्हणून सोमवारी पूर्ण दिवस आचरा बाजारपेठ बंद ठेवून व्यापारी संघटना निषेध नोंदविणार आहेत.
मनसे मच्छिमारांच्या पाठिशी
राडा प्रकरणानंतर मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आचरा पिरावाडी येथे भेट देत घडलेला राडा तसेच पोलीस आणि पत्रकार यांना झालेली मारहाण निंदनीय असली तरी याचे कर्ताकरविता हे शासन आहे. तत्कालीन पालकमंत्री व आताचे पालकमंत्री यांनी मच्छिमारांच्या भावनेशी खेळ केला. स्थानिक आमदारांनी पुढाकार घेऊन जणू काय मच्छिमारांचा प्रश्न सोडविला असा आव आणत त्यांची दिशाभूल केली. पारंपरिक मच्छिमार हे गुन्हेगार नसून त्यांचा रोजीरोटीसाठी असलेला लढा आहे. महाराष्ट्र शासनाने चांगला वकील दिला असता तर पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय करणारा निर्णय झाला नसता. यापुढे आंदोलन व न्यायालयीन लढ्यात मनसे ही पारंपरिक मच्छिमारांच्या पाठिशी राहणार असल्याचे यावेळी उपरकर म्हणाले. (वार्ताहर)
वादास शिवसेना जबाबदार : काँग्रेस
राडा प्रकरणानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, अशोक सावंत, मंदार केणी यांनी आचऱ्यात भेट दिली. यावेळी सतीश सावंत यांनी या पारंपरिक व पर्ससीन मच्छिमारांचा वाद चिघळल्यास पालकमंत्री जबाबदार आहेत. हा मच्छिमारांचा प्रश्न चिघळवून त्याला खतपाणी घालण्याचे काम शिवसेना करत असल्याचा आरोप केला. भविष्यात मच्छिमार एकत्र येवून एकोप्याने व्यवसाय करतील यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचे सावंत म्हणाले.