कोणतेही आव्हान स्वीकारण्याची तयारी
By Admin | Updated: October 7, 2016 23:49 IST2016-10-07T23:13:08+5:302016-10-07T23:49:48+5:30
संदेश पारकर : ‘शत प्रतिशत’ भाजप नारा सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करणार

कोणतेही आव्हान स्वीकारण्याची तयारी
कणकवली : सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा मी एक कार्यकर्ता आहे. माझी नाळ जनतेशी जुळलेली आहे. त्यामुळे माझा जनाधार कधीही संपणार नाही. विरोधकांनी माझ्या जनाधाराची काळजी करु नये. वेळ आल्यावर निश्चितच आमचा जनाधार दाखवून देवू. असे सांगतानाच भाजप पक्ष श्रेष्ठींनी टाकलेला विश्वास सार्थकी लावताना कोणतेही आव्हान स्वीकारण्याची तयारी ठेवलेली आहे. यापुढे सिंधुदुर्गात ‘शत प्रतिशत भाजप’ हा नारा सत्यात उतरविण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्याकडे लक्ष देणार असल्याचे कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी येथे स्पष्ट केले.
मुंबई येथे भाजपत प्रवेश केल्यानंतर शुक्रवारी संदेश पारकर कणकवलीत दाखल झाले. येथील रेल्वे स्थानक तसेच भाजप संपर्क कार्यालयाजवळ त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप उपाध्यक्ष राजश्री धुमाळे, तालुकाध्यक्ष रवींद्र्र शेट्ये, बबलू सावंत, सुहास सावंत, बबली राणे,अमृत चौगुले आदी उपस्थित होते.
संदेश पारकर म्हणाले, भाजपची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. सिंधुदुर्गात तिसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजप वाढविताना काँग्रेस पक्षच प्रमुख विरोधी पक्ष रहाणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसला भाजपाच्या माध्यमातून समर्थ पर्याय निर्माण केला जाईल.
त्यामुळे राणे विरोधक म्हणून काम करण्याचा अथवा समोर कोण व्यक्ति विरोधक म्हणून आहे. याचा विचार करण्याची गरज वाटत नाही. त्यापेक्षा आमची लढाई जिंकण्यासाठीच असणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात भाजप पक्षाचे सदस्य असावेत यादृष्टीने प्रयत्न केले जातील.तेथील कार्यकर्त्यांना ताकद देवून त्यांना खंबीरपणे उभे करण्यासाठी नियोजन करण्यात येईल.
पूर्वी कोण कुठल्या पक्षात होते ? यापेक्षा आता सर्वच भाजपात आहेत हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे एकत्रितपणे विचार करून निर्णय घेतले जातील. गटातटाचे राजकारण होणार नाही. पक्ष श्रेष्ठींच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्षांसह जिल्ह्याचा दौरा करून संघटना बळकट करण्यात येईल.
१0 आॅक्टोबर रोजी नगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बांदा ते कासार्डे अशी रॅली काढण्यात येणार आहे.
तसेच लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वेळ घेऊन त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात मेळावा घेण्यात येईल. यावेळी पक्षाचे अन्य नेतेही उपस्थित राहतील असे संदेश पारकर यांनी यावेळी बोलताना
सांगितले. (प्रतिनिधी)
युती सन्मानपूर्वक व्हावी
प्रत्येक पक्ष आपल्यापरीने जिल्ह्यात पक्ष वाढविण्याचे काम करीत आहे. तसाच शिवसेना व भाजप ही करीत आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेत निर्विवाद वर्चस्व मिळवायचे असेल तर शिवसेना - भाजपा युती होणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत यामधील जिल्ह्यातील स्थितीबाबत भाजपच्या वरिष्ठांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर ते जो निर्णय युतीबाबत घेतील तो आम्हाला मान्य असेल. परंतु युती झाली तर ती सन्मानपूर्वक व्हावी असे आपले मत असल्याचे एका प्रश्नाचे उत्तर देताना संदेश पारकर म्हणाले.
आक्रमक व्हा !
जनतेबरोबर आम्ही नेहमी राहणार आहोत. जनतेला मूलभुत सुविधा विनासायास मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न रहातील. त्यामुळे सिंधुदुगार्तील भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी आता आक्रमक व्हावे, असे आवाहन संदेश पारकर यांनी यावेळी केले.