वेंगुर्लेतील पोटनिवडणुकीला स्थगितीची शक्यता
By Admin | Updated: January 10, 2015 00:22 IST2015-01-09T23:57:40+5:302015-01-10T00:22:01+5:30
उच्च न्यायालयाचा निर्णय : सात नगरसेवकांचे निलंबन रद्द

वेंगुर्लेतील पोटनिवडणुकीला स्थगितीची शक्यता
वेंगुर्ले : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या बारा नगरसेवकांचे निलंबन झाले होते. मात्र नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे उर्वरित सात जागांसाठी १८ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. दरम्यान, शुक्रवारी उच्च न्यायालयात गटनेते वामन कांबळी यांच्यासह सात नगरसेवकांचे निलंबन न्यायालयाने रद्द केल्याने या सातही नगरसेवकांना अभय मिळाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश येताच १२ जानेवारीपर्यंत निवडणुकीला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.
वेंगुर्ले नगराध्यक्ष निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये दोन गट निर्माण झाले. या गटांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी पक्षादेश झुगारून काम केल्याने एकमेकांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली होती.
जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी विद्यमान नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांच्यासह राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील बाराही नगरसेवकांना अधिनियम १९८६ कलम ३ (१) (अ) व ३ (१) (ब) प्रमाणे अपात्र ठरविल्याचा निकाल जाहीर केला. नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बारा उमदेवार निवडून आल्याने राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. नगराध्यक्षपदी नम्रता कुबल, उपनगराध्यक्षपदी रमण वायंगणकर यांची निवड झाली होती.
२५ जून २०१३ रोजी या दोघांनीही पदांचे राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले होते. पुढील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अन्नपूर्णा नार्वेकर, पूजा कर्पे, नम्रता कुबल यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. यामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले होते. त्यावेळी जिल्हा पक्षनिरीक्षक आमदार किरण पावसकर यांच्या उपस्थितीत पक्षाच्या सर्व नगर सेवकांची बैठक ५ जुलै रोजी कुडाळ शासकीय विश्रामगृहात झाली होती. त्यावेळी पावसकर यांच्या सूचनेप्रमाणे अन्नपूर्णा नार्वेकर यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, पूजा कर्पे यांनी अर्ज मागे घेतला नव्हता. तत्कालिन जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांनी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या आदेशाने अन्नपूर्णा नार्वेकर यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करून बाराही नगरसेवकांनी पक्षादेश काढला होता. मात्र, विरोधी गटाच्या सात नगरसेवकांनी तो आदेश न पाळता कर्पे यांना मतदान केल्याप्रकरणी अपात्र ठरवावे, यासाठी तक्रार दाखल केली होती. नगरपरिषद निवडणुकीवेळी बारा नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले होते. त्यांच्या बैठकीत वामन कांबळे यांची गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
नगराध्यक्षपदाच्या निवडीवेळी कांबळे यांनी कर्पे यांना मतदान करण्याचा पक्षादेश बजावला होता. त्याचे उल्लंघन केल्याने अधिनियमाप्रमाणे अपात्रतेची कारवाई करावी, यासाठी कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली होती. त्यानुसार त्यांनी बाराही नगरसेवकांना अपात्र ठरविले. या निर्णयाविरोधात प्रसन्ना कुबल यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार प्रसन्ना कुबल व इतर चार जणांना अभय मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद कायम राहिले
आहे. (वार्ताहर)