कालसेकरच्या चक्रव्युहात पोलीस ?
By Admin | Updated: July 24, 2015 00:39 IST2015-07-23T21:52:56+5:302015-07-24T00:39:00+5:30
वचक संपला : नऊ दिवसांनंतरही आरोपी मोकाट

कालसेकरच्या चक्रव्युहात पोलीस ?
रत्नागिरी : दोन खुनांसह २९ गंभीर गुन्ह्यातील आरोपी साहील कालसेकरने पोलिसांच्या वॉचमधून पलायन केल्यानंतर त्याला चक्रव्युहात अडकवून पुन्हा बेड्या घालण्यात ९ दिवसांनंतरही पोलिसांनी अपयश आले आहे. कालसेकरचा शोध कोठे व कसा घ्यावा, या मुद्द्यावरून सध्या पोलीसच चक्रव्युहात सापडल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे जिल्हा पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला की काय, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.
याप्रकरणी तातडीने पोलिसांनी साहीलला पकडले असते, तर पोलिसांना कोणी कितीही चकवा दिला तरी तो फार काळ लपून राहू शकत नाही, पोलिसांचे जाळे तेथपर्यंत पोहोचणारच, हे सिध्द झाले असते व अन्य गुन्हेगारांना जरब बसली असती. मात्र, अद्यापपर्यंत गुंड कालसेकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. चिपळूणच्या न्यायालयाने कालसेकरला अटक वॉरंट काढल्यानंतर हे प्रकरण स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे आले.
या शाखेच्या पोलिसांनी साहील एमआयडीसीत आल्याचे समजताच त्याला पकडण्यासाठी जोरदार कारवाई केली. पोलीस नाईक उदय वाजे यांनी साहीलला मिठी मारून पकडून ठेवले. पाच ठिकाणी चावे घेऊनही वाजे यांनी त्याला सोडले नाही. त्याही स्थितीत साहीलला पकडण्यात आले. मात्र, त्यानंतरच खरा बेफिकिरपणा झाला, अन उपचारासाठी रुग्णालयात असलेला कालसेकर तेथे वॉचवर असलेल्या मुख्यालय पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. या घटनेला तब्बल ९ दिवस होऊन गेले आहेत. मात्र, कालसेकर मोकाट आहे.
कालसेकर पलायनप्रकरणी निष्काळजीपणा व बेफिकिरी दाखवणाऱ्या चार पोलिसांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर पोलीस पथकांद्वारे शोधमोहीम राबवण्यात येत असली तरी त्यात काहीच प्रगती झालेली नाही. त्यामुळे कालसेकर आता सापडेल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. खरेतर रत्नागिरी पोलिसांनी याआधी काही प्रकरणात अतिशय चांगल्या प्रकारे तपासकाम केले आहे. मात्र, कालसेकर प्रकरणात असे काय मोठे घडले की, त्याच्यापर्यंत पोलिसांचे जाळे ९ दिवस उलटूनही पोहोचू नये, याचेच सर्वांना आश्चर्य वाटत आहे आणि त्यामुळे गूढही निर्माण झाले आहे. नायशी (ता. चिपळूण) येथील असलेल्या साहील कालसेकर या गुन्हेगाराची संपूर्ण कुंडली चिपळूण पोलिसांकडे आहे. त्याचा ठावठिकाणा असलेली ठिकाणेही पोलिसांना माहिती आहेत. असे असताना त्याच्यापर्यंत पोहोचण्यात व त्याला पुन्हा बेड्या ठोकण्यात यश आलेले नाही, त्यामुळे गूढ निर्माण झाले आहे. तो पसार झाल्यानंतर जिल्हाभरात तत्काळ नाकेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे तो जिल्ह्याबाहेर जाण्याची शक्यता कमीच आहे. तो जिल्ह्यातच असावा, असा संशय आहे. परंतु अद्याप तो सापडलेला नाही. त्यामुळे अन्य गुन्हेगारांचा धीर चेपण्याची भीती निर्माण झाली आहे. कालसेकरला लवकरात लवकर पकडणे, त्यासाठीच आवश्यक बनले आहे. (प्रतिनिधी)
गुंड कालसेकरचे आश्रयस्थान कोणते ?
अलिकडील काळात गुन्हेगार आणि काही पुढारी यांच्यात साटेलोटे असल्याची चर्चा नेहमीच होते. नेहमीच्या जागी सापडत नसलेला कालसेकर अशा संशय न येणाऱ्या कोणा पुढारी वा प्रतिष्ठिताच्या आश्रयाला नाहीना, या दिशेनेही तपास करण्याची आवश्यकता आहे. जिल्हा रुग्णालयात कालसेकरला दाखल केल्यापासून ते पलायन करण्यापर्यंतचे सी. सी. टी. व्ही. फुटेज रुग्णालयात उपलब्ध आहे. त्यावरून काही तपास लागल्याचे दिसत नाही. मुळातच गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या रुग्णालयीन उपचारादरम्यान कडक बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे घडले नाही.
साहीलला लवकरच पकडणार, पोलिसांचा विश्वास
संपूर्ण जिल्ह्याला हादवरुन टाकणारा कुप्रसिद्ध गुंड साहील कालसेकर पोलिसांच्या तावडीतून निसटल्याच्या घटनेला ९ दिवस होऊनही जिल्हा पोलीस त्याला पडकण्यात यशस्वी झाले नसले तरी लवकरच गजाआड करण्यात येईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेसह अनेक पोलीस स्थानकांची स्वतंत्र पथके कालसेकरच्या शोधासाठी बाहेर पडली आहेत. साहीलला पकडण्यासाठी गेलेल्या पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे खास वृत्त असून, उद्भवणाऱ्या परिस्थितीस चोख प्रत्युत्तर द्या, अशी सूचनाही देण्यात आल्याचे समजते. १५ जुलै रोजी साहीलने जिल्हा शासकीय रुग्णालयातून पळ काढला होता. यानंतर बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. गेले ९ दिवस पोलिसांनी जिल्हा पिंजून काढला. तरीही साहीलला पुन्हा ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांना चकवा देऊन फरार होण्यात कालसेकर तरबेज आहे. पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही तो थेट हल्ला करतो, असे पोलीस सुत्रांनी सांगितले.