कृषी अधीक्षक कार्यालय अद्याप पिछाडीवर
By Admin | Updated: February 26, 2015 00:09 IST2015-02-25T23:03:16+5:302015-02-26T00:09:48+5:30
बंधाऱ्यांची उद्दिष्ट्यपूर्ती : दोडामार्ग, मालवण, वैभववाडी अग्रेसर

कृषी अधीक्षक कार्यालय अद्याप पिछाडीवर
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व संभाव्य पाणीटंचाईवर मात व्हावी यासाठी जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या ६ हजार ७०० बंधाऱ्यांपैकी ४ हजार ७८५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आलेले उद्दिष्ट्य दोडामार्ग, मालवण व वैभववाडी या तालुक्यांनी १०० टक्क्यांहून अधिक पूर्ण केले आहे तर जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक कार्यालय पिछाडीवर राहिला आहे.साधारणत: मे अखेरीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पाणीटंचाई भासण्यास सुरुवात होते. त्यातच यावर्षी कमी पडलेला पाऊस त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असल्याने यावर्षीही मे महिन्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषद प्रशासनाने यावर्षी कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ६ हजार ७०० बंधाऱ्यांचेही उद्दीष्ट्य प्रत्येक तालुक्यात विभागून दिले. आठ तालुक्यांना ५ हजारांचे तर राज्य शासनाच्या कृषी विभाग १५०० व सामाजिक वनीकरण विभागाला २०० असे बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट्य दिले होते.
आजअखेर ६७०० बंधाऱ्यांपैकी १८९७ कच्चे व २८८८ वनराई असे ४७८५ बंधारे बांधण्यात आले आहेत.काही तालुके १00 टक्केवर
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देण्यात आलेले बंधाऱ्यांचे उद्दिष्ट्य दोडामार्ग, मालवण व वैभववाडी तालुक्यांनी १०० टक्क्यांच्यावर पूर्ण केले आहे. त्याबद्दल प्रशासनाच्यावतीने तालुक्यांनी अभिनंदन केले जात आहे.कणकवली तालुका जैसे थे
कणकवली तालुक्याला जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने ८५० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. त्यापैकी या तालुक्याने नोव्हेंबर २०१४ अखेर कच्चे बंधारे ३२१ व वनराई बंधारे १९९ असे मिळून ५२० बंधारे बांधले होते. मात्र डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या अडीच महिन्यांच्या कालावधीत या तालुक्याने एकही बंधारा बांधला नसल्याचे प्रशासनाच्या अहवालानुसार उघड झाले
आहे. (प्रतिनिधी)