अपघाताच्या संख्येत एस. टी.चे चाक घसरतेय
By Admin | Updated: January 2, 2016 08:29 IST2016-01-01T21:58:13+5:302016-01-02T08:29:23+5:30
वर्षभरात १३२ अपघात : रस्ता सुरक्षा सप्ताह महामंडळाला वाचवणार?

अपघाताच्या संख्येत एस. टी.चे चाक घसरतेय
रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी नववर्षाच्या आरंभीच रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. अपघात कमी होण्यासाठी प्रशिक्षणे, मार्गदर्शने यांसारखे विविध उपक्रम महामंडळ राबवित असते. परंतु गेल्या वर्षभराचा आढावा घेतला तर अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. वर्षभरात आतापर्यंत एकूण १३२ अपघात झाले आहेत.
वास्तविक महामंडळाकडून दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. केवळ सप्ताहाच्या कालावधीपुरती सुरक्षेबाबत खबरदारी घेण्यापेक्षा याबाबत कायमस्वरूपी दक्ष राहणे अपेक्षित आहे. वेळोवेळी चालकांसाठी प्रशिक्षण, योग्य नियोजन, गाड्यांची दुरूस्ती, जुन्या गाड्या भंगारात काढून नवीन गाड्यांचा समावेश आदी बाबींची दक्षता घेऊनसुध्दा गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत अपघाताच्या संख्येत यावर्षी वाढ झाली आहे. २०१३मध्ये वर्षभरात १२० अपघात झाले होते. २०१४मध्ये ८८ अपघात घडले, तर यावर्षी तब्बल १३२ अपघात झाले आहेत. पैकी मरणांतक १४, गंभीर १०२, किरकोळ १६ अपघात घडल्याची नोंद
आहे. सन २०१३मध्ये एकूण १२० अपघातांपैकी १७ प्राणांतिक अपघात असून, ९६ अपघात गंभीर, तर किरकोळ अपघात ७ घडले होते. सन २०१४मध्ये प्राणांतिक अपघात ९ असून, गंभीर अपघात ७३ तसेच किरकोळ अपघात ६ झाले होते. सलग दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी मरणांतक अपघातामध्ये वाढ झाली आहे. एस. टी.च्या ७९० गाड्या असून, दररोज ४५०० फेऱ्यांव्दारे २ लाख १६ हजार किलोमीटर प्रवास होतो. त्यासाठी दररोज एकूण ५० हजार लीटर डिझेल लागते. किमान ३०,१५,५०० रूपये खर्च येतो. प्रतिदिन विभागाला ६५ लाख रुपये खर्च येतो. विभागात १४७३ चालक, १६०० वाहक आहेत. दरमहा सरासरी ५ ते १७ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत असून, वर्षभरात ९६ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून २१ हजार ३६४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गतवर्षी (२०१४) एकूण १३९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ३१ हजार ७८४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. आता फुकट्या प्रवाशांचे प्रमाण कमी झाले असले तरी अपघात वाढले आहे. यावर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. अपघात कमी होण्यासाठी महामंडळ आणखी काही खबरदारी घेत कोणते नियोजन करते, यावरच प्रवाशांची सुरक्षितता अवलंबून आहे. (प्रतिनिधी)
महिनेप्राणांतिकगंभीरकिरकोळएकूण
जानेवारी२३१६
फेब्रुवारी०७३१०
मार्च२७११०
एप्रिल१८११०
मे०७३१०
जून०१०३१३
जुलै३१००१३
आॅगस्ट१११२१४
सप्टेंबर११३११५
आॅक्टोबर०७१८
नोव्हेंबर११००११
डिसेंबर३८११२
एकूण१३९७१६१३२