स्वातंत्र्यलढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची
By Admin | Updated: January 8, 2015 00:04 IST2015-01-07T20:52:58+5:302015-01-08T00:04:57+5:30
आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांची २०२ वी जयंती साजरी होताना पत्रकारांबरोबरच सिंधुदुर्गवासीयांनाही अभिमान

स्वातंत्र्यलढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची
वेंगुर्ले : वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून जगात अनेक ठिकाणी क्रांती व जनआंदोलने उभी राहिली आहेत. ब्रिटिशांच्या विरुद्धचा स्वातंत्र्य लढा हा टिळक, आगरकर, गांधी यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून लढवून देशभर जनआंदोलन उभे केले आणि स्वातंत्र्यही मिळवून दिले. त्या वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांची २०२ वी जयंती साजरी होताना पत्रकारांबरोबरच सिंधुदुर्गवासीयांनाही अभिमान वाटतो, असे प्रतिपादन प्राचार्य के. जी. केळकर यांनी केले. येथील अॅड. दत्ता पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या सभागृहात मराठी वृत्तपत्राचे आद्यजनक बाळशास्त्रीजांभेकर यांच्या २०२ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य केळकर यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पूजा कर्पे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन वराडकर, सल्लागार प्रदीप सावंत, संघटक सुरेश कौलगेकर, सदस्य मॅक्सी कार्डाेज, विनायक वारंग, भरत सातोसकर, प्रथमेश गुरव, सावळाराम भराडकर, डॉ. संगीता मुळे, डॉ. प्रिया मराठे, डॉ. समता धुरी, डॉ. सतीश पाटील, शेखर साळगावकर, ऋषिकेश बिर्जे यांच्यासह कॉलेजमधील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रदीप सावंत, सुरेश कौलगेकर, डॉ. पूजा कर्पे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचे जीवनकार्य आणि पत्रकारितेतील योगदान याबाबत मार्गदर्शन केले. विनायक वारंग यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)