आंबा-काजू नुकसानभरपाई वाटप रखडले
By Admin | Updated: August 1, 2015 00:37 IST2015-07-31T22:37:00+5:302015-08-01T00:37:05+5:30
आंबा-काजू नुकसानभरपाई वाटप रखडले

आंबा-काजू नुकसानभरपाई वाटप रखडले
रत्नागिरी : फेब्रुवारी व मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकाचे नुकसान झाले. शासनाकडून पंचनाम्याचे अहवाल मागवून नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रुपयांचा निधी जाहीर केला आहे. पैकी ३३ कोटी ८१ लाख रूपये निधीचा पहिला हप्ता रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त होऊन दोन महिने उलटले तरी वितरण प्रक्रियेला अद्याप सुरूवात झालेली नाही.जिल्ह्याची आर्थिक स्थिती मजबूत करणारे आंबापीक असून, जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर आंबा पिकाचे, तर काजू पिकाचे ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे प्राथमिक अंदाजात नमूद करण्यात आले होते. शासनाकडून कृषिसेवक, तलाठी व ग्रामसेवक यांना पंचनाम्याचे आदेश दिले. त्यावेळी अवकाळी पावसाने जिल्ह्यातील २० हजार ७१८ .२० हेक्टर क्षेत्र आंबा, तर ११०९६.४६ हेक्टर क्षेत्रावरील काजूपिकाचे मिळून एकूण ६४,८७४ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल पाठवण्यात आला. २५ मार्चपर्यंत आलेल्या पंचनाम्याचे अहवाल शासनाकडे पाठविण्यात आले. मात्र, तद्नंतर आलेला पंचनामा गृहीत धरण्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांकडून आलेल्या पंचनाम्याची यादी तशीच राहिल्याने या यादीतील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील साडेसहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे पाठविण्यात आलेले पंचनामे अद्याप प्रलंबित राहिले आहेत.
अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकाचे नुकसान झाल्याबद्दल शासनाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रूपयांचा निधी जाहीर केला आहे. पैकी ३३ कोटी ८१ लाख रूपये निधीचा पहिला हप्ता रत्नागिरी जिल्ह्याला जूनमध्येच प्राप्त झाला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांप्रमाणे नुकसान भरपाईचे वितरण करण्याचे जाहीर करण्यात आले होते. वितरण प्रक्रिया महसूल विभागाकडून राबवण्यात येणार होती. मात्र, अद्याप वितरण प्रक्रियेला प्रारंभ झालेला नाही.
आंबा पिकाचे २०७१८.२० हेक्टर, तर काजू पिकाचे ११०९६.४६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल २५ मार्चला शासनाकडे पाठवण्यात आला होता. परंतु २६ मार्चनंतर आलेल्या पंचनाम्याचे अहवाल पाठविणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे शेतकरीवर्ग नुकसानभरपाईपासून वंचित राहणार आहे. (प्रतिनिधी)
तालुकाआंबाकाजूएकूण
मंडणगड११५४.७२३८२.९२१५३७.६४
दापोली१०३९.११५२१.६३१५६०.७४
खेड१०९३.२४३१४.८०१४०८.०४
चिपळूण१४६७.७३३३०.८११७९८.३४
गुहागर१९९१.८१९२६.२०२९१८.०१
संगमेश्वर २८३६.४६२७०४.४४५५४०.९०
रत्नागिरी५११३.५५१६२२.५०६७२६.०५
लांजा२५९०.४९२८७३.९८५४६४.४७
राजापूर३४४१.२९१४१९.१३४८०७.४२
एकूण२०७१८.२०११९६.४६३१८१४.६६