राज्यमंत्र्यांची जिल्हा रुग्णालयाकडे पाठ
By Admin | Updated: February 2, 2015 00:07 IST2015-02-01T21:37:21+5:302015-02-02T00:07:04+5:30
या पार्श्वभूमीवर आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देणे व परिस्थिती जाणून घेणे आवश्यक होते.

राज्यमंत्र्यांची जिल्हा रुग्णालयाकडे पाठ
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्याच्या एकूणच वैद्यकीय सेवेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली असताना, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा आरोप नागरिकांकडून होत असताना याकडे दुर्लक्ष करून जिल्हा रुग्णालयाला भेट न देताच आरोग्य राज्यमंत्री परस्पर माघारी फिरल्याने त्यांच्या या पर्यटन सफरीबाबत नेमके इंगित काय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेदरम्यान जयश्री शिंगाडे या ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. तर संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संबंधित महिलेच्या नातेवाइकांकडून होत आहे. यासाठी कणकवली येथे उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय ओरोस येथे तीव्र आंदोलनही छेडण्यात आले. तसेच गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा आधार घेत तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमून त्यांच्या अहवालानुसार कारवाई करण्याचा आणि आमदार वैभव नाईक यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देणे व परिस्थिती जाणून घेणे आवश्यक होते. मात्र, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री शनिवारी जिल्हा दौऱ्यावर असताना व त्यांचा जिल्हा रुग्णालयाला भेट देण्याचा निश्चित दौरा असूनही ते या रुग्णालयाकडे फिरकलेले नाहीत. जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयाची आरोग्यसेवा ढासळली असताना व हलगर्जीपणामुळे एका ४० वर्षांच्या महिलेचा बळीगेल्याची घटना ताजी असतानाही या समस्येकडे आरोग्य राज्यमंत्र्यांनी दुर्लक्ष करावे आणि केवळ जिल्ह्याची पर्यटन सफर करावी, याबाबत तीव्र नाराजी पसरली आहे. जिल्हा मेडिकल कक्षाचे औपचारिक उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, ते फिरकलेच नसल्याने मेहनतीवर पाणी फेरले, तर पुष्पगुच्छ कोमेजले. (प्रतिनिधी)