समर्थ हत्तीने घेतला अखेरचा श्वास
By Admin | Updated: May 29, 2015 23:55 IST2015-05-29T22:48:18+5:302015-05-29T23:55:28+5:30
सिंधुदुर्गातील घटना : दीड महिन्यापूर्वी ‘गणेश’चा मृत्यू

समर्थ हत्तीने घेतला अखेरचा श्वास
माणगाव : माणगाव आंबेरी येथे पकडून ठेवण्यात आलेल्या तीन हत्तींपैकी ‘गणेश’ या हत्तीने दीड महिन्यापूर्वी देह ठेवल्यानंतर शुक्रवारी आजारी समर्थ हत्तीने आपला देह ठेवला. दोन दिवसांपासूनच या हत्तीला क्रॉलबाहेर काढून मुक्त हवेत ठेवण्यात आले होते; पण शुक्रवारी अचानक दुपारनंतर समर्थची प्रकृती ढासळू लागली आणि कोणाला काही कळायच्या आतच सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्याने आपला देह ठेवला. या घटनेने पुन्हा एकदा माणगाव परिसर हादरून गेला आहे. समर्थ हत्तीच्या पायाला जखम झाल्याने तो आजारी होता. त्याच्या पायाला सूजही आली होती.
माणगाव खोऱ्यात गेली दहा वर्षे हत्तींनी धुमाकूळ घातला होता. हत्तींना पकडून त्यांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने पकडण्यात आले होते. त्यांचे नामकरण गणेश, समर्थ व भीम असे करण्यात आले; पण पकडून अवघे काही दिवस होत नाही, तोच गणेश हत्तीने १० एप्रिलला म्हणजेच दीड महिन्यापूर्वी देह ठेवला.
त्यानंतर ‘समर्थ’च्या आजारपणाच्या बातम्या एकामागोमाग येऊ लागल्या. कर्नाटक येथील डॉ. उमाशंकर यांनी स्वत: आंबेरीत येऊन त्याच्यावर उपचार केले. या उपचारांना समर्थने प्रतिसादही दिला. त्याला क्रेनचा आधार देऊन उठविले होते. त्याच्या पायाला झालेली जखमही बरी होत होती. परंतु, पायाची सूज उतरत नसल्याचे वेळोवेळी दिसत होते.
दोन दिवसांपूर्वी खासदार विनायक राऊत यांच्यासह मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांनी आंबेरी येथे येऊन क्रॉलबाहेर काढण्यास परवानगी दिली. दोन दिवस हे हत्ती मुक्त विहार करीत होते.
अस्वस्थ समर्थची अखेरसकाळपासून मुक्तपणे फिरणारा समर्थ हत्ती अचानक तीन वाजता खाली बसला. त्यामुळे वन विभागाने स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले. तोपर्यंत चार वाजले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘समर्थ’ला पाहिल्यानंतर त्याचा प्रवास थांबला होता. त्यामुळे मृत घोषित केले.
आज शवविच्छेदन
‘समर्थ’चा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण स्पष्ट झाले नाही. शुक्रवारी ही घटना उशिरा घडली. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना शवविच्छेदन करण्यास रात्र होईल, असे वाटत असल्यानेच शनिवारी शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.