कऱ्हाड-चिपळूण मार्गाचा बागुलबुवा
By Admin | Updated: March 3, 2015 00:35 IST2015-03-02T21:52:26+5:302015-03-03T00:35:28+5:30
मोहन केळुसकर यांचा सुरेश प्रभूंवर आरोप

कऱ्हाड-चिपळूण मार्गाचा बागुलबुवा
कणकवली : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात कऱ्हाड-चिपळूण या नवीन मार्गासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वास्तविक या मार्गावर कोयना धरण असून या धरणाच्या पाण्यापासून वीजनिर्मिती करणारे संयंत्रे जमिनीखाली १०० मीटर खोदाई करून बसविली आहेत. त्यामुळे भौगोलिक आणि व्यवहारीदृष्ट्या कऱ्हाड-चिपळूण हा रेल्वे मार्ग म्हणजे प्रभंूचा बागलबुवा आहे. जागतिक स्तरावर जलवाहतूक स्वस्त असल्याने बंदरांना कमालीचे महत्त्व आले आहे. या परिस्थितीत प्रभूंनी केवळ पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला खूृश करण्यापेक्षा कोल्हापूर-रत्नागिरी किंवा कणकवलीला जोडणाऱ्या मार्गाची घोषणा केली असती तर हे मार्ग पुढे बंदरांना जोडता आले असते. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांची ही घोषणा केवळ बागलबुवा आहे, अशी टीका कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी शनिवारी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात केळुसकर म्हणाले, कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाची मागणी ही केवळ राज्याच्या अथवा कोकणच्या भल्यासाठी नाही. या मार्गामुळे देशाचा उत्तर-दक्षिण भाग जवळच्या मार्गावरून जोडला गेला आहे. संरक्षणाच्यादृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे जलद वाहतुकीच्यादृष्टीने या मार्गाचे दुपदरीकरण तातडीने होणे हे देशाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. प्रभूंच्या स्वप्नातील ५० हजार रोजगार निर्मितीची क्षमता दुपदरीकरणामुळे फलद्रुप होईल. कऱ्हाड-चिपळूण मार्ग झाला तर त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, बागायतदार, साखर कारखाने, उद्योगांना होणार आहे. त्याऐवजी कोल्हापूर-रत्नागिरी अथवा कणकवलीला जोडणारा मार्ग हवा. त्यातही विजयदुर्ग बंदर होऊ घातले आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पही मार्गी लागणार आहे. त्यामुळे कोल्हापूर ते विजयदुर्ग हा बंदर जोडणारा मार्ग संयुक्त ठरेल. त्यामुळे कोकणासह राज्यातील सर्व पक्षांच्या खासदारांनी या रेल्वेच्या दुपदरीकरणासह बंदराला जोडणारा मार्ग होण्यासाठी रेल्वे मंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी लॉबी निर्माण करायला हवी. (प्रतिनिधी)