गंगा भाविकांच्या आनंदाला उधाण
By Admin | Updated: July 28, 2015 23:49 IST2015-07-28T23:49:42+5:302015-07-28T23:49:42+5:30
सर्व कुंडे भरली : सफाईचे काम घेतले हाती

गंगा भाविकांच्या आनंदाला उधाण
राजापूर : ऐन पावसाळ्यात आगमन झालेली गंगा पूर्ण भरात असून, काशीकुंडासह सर्व कुंडात तुडूंब पाणी साठा आहे. नेहमीप्रमाणेच गोमुखातून मोठ्या वेगाने पाणी खाली पडत आहे. त्यामुळे समस्त भाविकांच्या आनंदाला उधाण आले आहे. एकादशीच्या मुहूर्तावर गंगा प्रकट झाली व समस्त भाविकांनी नेहमीप्रमाणे त्या स्थानावर धाव घेतली.दर तीन वर्षांनी प्रकट होणारी राजापूरची गंगामाई मागील काही वर्षात दरवर्षाने प्रकट झाली आहे. त्यामुळे समस्त भाविक बुचकाळ्यात सापडले आहेत. यापूर्वी ती २०१२ला प्रकट झाली होती व त्यानंतर गतवर्षी २३ जुलै २०१४ला ती पुन्हा प्रकट झाली आणि २६ आॅक्टोबर २०१४ला अंतर्धान पावली होती. सर्वसाधारणपणे तिचा गमन व प्रकट होण्याची वेळ यामध्ये दोन वर्षांहून अधिक कालखंड असतो. त्यामुळे दर तीन वर्षांनी गंगामाई अवतीर्ण होते. असे यापूर्वी बोलले जात होते. मात्र, सन २०१२ पासून ती दरवर्षी प्रकट होत आहे.
सोमवारी आषाढी एकादशी सर्वत्र साहरी होत असतानाच दुपारी १ ते १.३० दरम्यान गंगामाईचे आगमन झाले. गंगाक्षेत्रावरील काशीकुंड या मुख्य कुंडासहीत उर्वरित तेरा कुंडे जलाने तुडुंब भरली आहेत तर काशिकुंडालगत असलेल्या गोमुखातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा झोत खाली कोसळत आहे. गंगा आगमन झाल्याची माहिती उशिराने कळताच गंगापुत्रांसहीत अनेक भाविकांनी गंगाक्षेत्राकडे धाव घेतली आणि सर्वांच्या आनंदाला उधाण आले. मूळ गंगेच्या मुखातूनही चांगला प्रवाह सुरु आहे. नेहमीप्रमाणे पूर्ण भराने गंगामातेचे आगमन झाल्याने मंगळवारी गंगापुत्रांनी गंगाक्षेत्रावरील साफसफाईचे काम हाती घेतले. सध्या नाशिकमध्ये कुंभमेळा सुरु असून शाही स्नानाचा लाभ भाविक घेत आहेत. याच कालखंडात राजापूरची गंगामाई अवतीर्ण झाली आहे.(प्रतिनिधी)
तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगामाई ही डिसेंबर ते जून या कालखंडात अनेक वेळा प्रकट झाली आहे व तिचा कालावधी हा नव्वद ते शंभर दिवस असा राहिलाआहे. पावसाळी दिवसात ती सहसा प्रकट होत नाही असे दाखले आजवर प्राप्त असतानाच ाुलै महिन्यात ती प्रकट झाली आहे हा भाविकांना सुखद धक्का आहे.