योग्य मोबदल्यासाठी महामार्ग पेटवू
By Admin | Updated: January 28, 2016 00:14 IST2016-01-27T23:53:23+5:302016-01-28T00:14:15+5:30
नीलेश राणे : माजी खासदारांचे उपोषण, इतर उपोषणकर्त्यांची दखल

योग्य मोबदल्यासाठी महामार्ग पेटवू
रत्नागिरी : महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी घेतल्या जाणाऱ्या जमिनीचा मोबदला जाहीर करावा. जैतापूरसारख्या कातळ जमिनीला आघाडी सरकारने ५ लाखावरून २२ लाख मोबदला केला, अशाच पद्धतीने मोबदला मिळाला पाहिजे, या मताशी आपण ठाम आहोत. शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, अन्यथा महामार्ग पेटवून टाकू, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी प्रजाकसत्ताक दिनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत केलेल्या साखळी उपोषणप्रसंगी दिला. आपण उपोषण करतानाच त्यांनी इतर उपोषणकर्त्यांच्याही भावना समजून घेतल्या.
मंगळवारी, प्रजासत्ताक दिनी माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत साखळी उपोषण केले. या प्रशासनाच्या विभागासंदर्भात आंदोलन आहे, त्या विभागाचे अधिकारी विभागाचा प्रतिनिधी आंदोलकांची भेट घेतात. मात्र, कोणताही अधिकारी किंंवा प्रतिनिधी आंदोलनस्थळी आलेला नाही, याबद्दल खेद व्यक्त करतानाच पालकमंत्र्यांच्या दबावाखाली ते आले नसावेत?, असा सवाल त्यांनी केला. यावेळी नीलेश राणे यांनी जिल्ह्यातील अन्य ठिकाणाहून आलेल्या आंदोलकांना भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. जिल्ह्यात नोकरी, शिक्षण, आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत. इथल्या आमदार आणि खासदारांना त्याचे काहीही पडलेले नाही. योग्य दखल घेऊन सरकार आणि प्रशासनाने निर्णय घेतला नाही, तर यापुढे रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार, असेही नीलेश राणे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्याच्या विकासात अडचणी आल्यास एकाही मंत्र्याच्या गाड्यांच्या काचा राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या साखळी उपोषणात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर, जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले, लोकसभा क्षेत्राध्यक्ष आनंद शिरवळकर, चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत, शहराध्यक्ष परिमल भोसले, माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर, चिपळूणचे उपनगराध्यक्ष लियाकत शहा, राजन देसाई, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बंटी वणजु, अशोक वाडेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांची
गाडी अडवली
साखळी उपोषण सुरू असताना नीलेश राणे यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची गाडी अडवली. माजी खासदारांच्या उपोषणाची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. मग सामान्य जनतेच्या उपोषणाकडे काय लक्ष देणार, असा जाब त्यांनी याप्रसंगी केला. जिल्हाधिकारी यांच्याकडे जनतेच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. तसेच इतर उपोषणकर्त्यांच्या निवेदनाचीही दखल घेण्यास भाग पाडले.