कोकणातच अंधश्रध्देचे प्रमाण सर्वाधिक

By Admin | Updated: January 23, 2015 00:47 IST2015-01-22T23:28:28+5:302015-01-23T00:47:24+5:30

बाबामहाराज सातारकर : जिन्यावरील लिंबाच्या टाचण्या काढून अनेकवेळा सरबत प्यायलो

Highest in the Konkan region | कोकणातच अंधश्रध्देचे प्रमाण सर्वाधिक

कोकणातच अंधश्रध्देचे प्रमाण सर्वाधिक

चिपळूण : इतर भागांपेक्षा कोकणात अंधश्रद्धा जास्त आहे. मूठ मारणे, लिंबू टाकणे, लिंबाला टाचण्या रोवणे असे अनेक प्रकार येथे जास्त आहेत. जिन्यावर टाकलेल्या लिंबाच्या टाचण्या काढून धुवून त्याचे आपण अनेकवेळा सरबत घेतले आहे. त्यामुळे आपली तब्बेत चांगली आहे, अशा शब्दात कीर्तनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांनी अंधश्रध्देवर टीका केली. ते ‘लोकमत’शी बोलत होते. अंधश्रद्धा, अनिष्ट परंपरांच्या गोष्टींवर त्यांनी प्रहार करुन विविध उदाहरणातून पटवून दिले. वारकरी सांप्रदायाची परंपरा मोठी आहे. सामाजिक ऐक्य, बंधुभाव, समता, प्रेम, भक्तिभाव निर्माण होतो. यासाठी वारकरी संप्रदायात येऊन माळ घातली पाहिजे. आतापर्यंत तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेशातून ८ लाख माळकरी वारकरी संप्रदायात सहभागी केले आहेत. कोकणात वारकरी वाढणे गरजेचे आहे. कोकणातील माणूस मनाने चांगला व बुद्धिमान आहे. आपल्यातील सद्गुण ओळखून दुसऱ्यासाठी जगण्याची भावना मनात ठेवली पाहिजे. आपल्यातील शक्ती दुसऱ्याच्या कल्याणासाठी वापरली पाहिजे. बाबामहाराज सातारकरांची १५० वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा असून, त्यांची ह. भ. प. चिन्मय स्वामी यांची सहावी पिढी कार्यरत आहे. पहिले कीर्तन वयाच्या १०व्या वर्षी केले. दरवर्षी ३०० ते ३२५ कीर्तने होतात. यावर्षी १०१वी दिंडी पंढरीला जाणार आहे. आपले दूरदर्शनसह अन्य खासगी वाहिन्यांवर कीर्तने, मुलाखती झाल्या आहेत. २०११ साली त्यांना श्री जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, वाराणसी येथे शंकराचार्यांकडून महाराष्ट्र भूमी भूषण कीर्तन चक्रवर्ती ही पदवी सन्मानपूर्वक प्रदान केली. ५ फेब्रुवारी १९९४ रोजी दिल्ली येथे तिसऱ्या जागतिक मराठी परिषदेत माजी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अनेक महत्त्वपूर्ण २७ पुरस्कारांनी गौरविले असून, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधून त्यांची कीर्तने झाली आहेत. अमेरिका, इंग्लंडमध्ये कीर्तनाचे कार्यक्रम झाले आहेत, असेही सातारकर यांनी सांगितले.
लोणावळ्यापासून ८ किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र दुधिवरे येथे २२ एकर जागेत आध्यात्मिक केंद्र उभारले आहे. जय जय राम कृष्ण हरी या बीज मंत्रावर आधारित मंदिर आहे. राम पंचायतन, श्री विठ्ठल रुक्मिणी, राधाकृष्ण देवतांची स्थापना केली आहे. वारकरी तत्वज्ञानावर आधारित मंदिर आहे. या मंदिराची उंची ८१ फूट असून, कळसावर जगद्गुरु ज्ञानेश्वर महाराज यांची स्थापना केली आहे. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज यांचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मंदिरातील खांबावर एकनाथ भागवतामधील ओव्या कोरण्यात आल्या आहेत. संत मंडळींच्या निवासासाठी ६ खोल्यांचे संतनिवास व स्वयंपूर्ण ६५ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. दररोज ५०० लोकांना अन्नदान करण्यात येते. दरवर्षी २७ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत सप्ताह साजरा केला जातो. भजन, प्रवचन, कीर्तन असे कार्यक्रम होतात. सामाजिक प्रबोधनासाठी आपल्या ५७ आॅडिओ कॅसेटस्, १२ सीडीज तयार केल्या आहेत. मरगळलेल्या समाजाला वारकरी सांप्रदायातून भक्तीमार्गाला नेण्याचे कार्य आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितल (प्रतिनिधी)

रामपूर - गुढे फाटा येथे अखंड हरिनामाच्या सप्ताहात हरिनामाच्या गजरात वारकऱ्यांच्या तालबद्ध नाचण्यात संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो लोक यावेळी उपस्थित होते. बाबामहाराज सातारकरांचा कार्यक्रम दि. २२ ते २५ या कालावधीत लांजा येथे होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Highest in the Konkan region