जग बदलायचे स्वप्न उराशी बाळगा : ठाकरे
By Admin | Updated: January 12, 2015 00:58 IST2015-01-12T00:53:57+5:302015-01-12T00:58:27+5:30
बहर युवा महोत्सवाचे उदघाटन

जग बदलायचे स्वप्न उराशी बाळगा : ठाकरे
रत्नागिरी : जयहिंद प्रतिष्ठानच्या बहर युवा महोत्सवात गेल्या काही वर्षांपासून आपल्या कलेचे सादरीकरण करणारे अनेकजण आज कलेच्या क्षेत्रात मानाने चमकत आहेत. आज पंधरा वर्षांच्या झालेल्या या बहर महोत्सवाद्वारे यापुढेही रत्नागिरीतील तरुण, तरुणींमधील सुप्त कलागुणांना चांगला वाव मिळेल, असे सांगतानाच छंद, कला जोपासा, जग बदलायचे स्वप्न उराशी बाळगून पुढे चला, यशाचा मार्ग निश्चित सापडेल, असे प्रतिपादन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.
येथील मराठा मैदानावर आयोजित बहर युवा महोत्सवाचे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते आज (रविवार) रात्री ९ वाजता झाला. यावेळी व्यासपीठावर होममिनिस्टर मालिकेचे सूत्रसंचालक व सेनेचे सचिव आदेश बांदेकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जिंदालचे अधिकारी पुष्पराज कोल्हे, जयहिंद प्रतिष्ठानचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बहर महोत्सवाच्या उदघाटनासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आल्याने युवासेनेत चैतन्याचे वातावरण होते. मराठा मैदानात उपस्थित युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. सर्वप्रथम ठाकरे यांनी शिवरायांच्या व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धपुतळ्यांस पुष्पहार वाहिला. या महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमास ठाकरे यांच्यासोबत आलेले आदेश बांदेकर हेसुध्दा कार्यक्रमाचे आकर्षण ठरले होते.
ठाकरे म्हणाले, शिवसेनेला खरी ताकद कोकणने दिलीे. सेनाप्रमुखांवर व शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या या कोकणला आपण कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही केव्हाही हाक मारा, मी कोकणात येईन असेही ते म्हणाले. आदेश बांदेकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सुसंस्कृत, संयमी नेतृत्व सेनेला पुढे नेत आहे. युवकांनी त्यांच्या पाठीशी राहावे. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते युवासेना अहवाल, दिनदर्शिका प्रकाशन झाले. (प्रतिनिधी)