दारूच्या पाच भट्ट्या उद्ध्वस्त
By Admin | Updated: January 14, 2015 00:34 IST2015-01-13T22:55:31+5:302015-01-14T00:34:59+5:30
मिरजोळेतील घटना : महिलेसह सातजणांना अटक; दोन केंद्रांवरही छापे

दारूच्या पाच भट्ट्या उद्ध्वस्त
रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्कच्या रत्नागिरी विभाग भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत आज, मंगळवारी पहाटे तालुक्यातील मिरजोळे येथील गावठी हातभट्टी दारूच्या पाच भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. तसेच हातभट्टी विक्री केंद्रांवरही छापे टाकले. या कारवाईत सात गुन्हे दाखल केले असून, सातजणांना अटक करण्यात आली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. या कारवाईत १ लाख २९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रत्नागिरीच्या उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. मिरजोळे नाखरेकरवाडी येथील पाच हातभट्ट्यांवर पहाटे धाड टाकून ४८०० लिटर गावठी दारूचे रसायन नष्ट करण्यात आले.
मिरजोळे-कोकणनगर -रत्नागिरी मार्गावर दुचाकीवरून गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या सुनील सदाशिव जाधव (रा. मिरजोळे - बौद्धवाडी) यालाही पथकाने अटक केली. क्रांतिनगर येथील गावठी दारू विक्री केंद्रावर छापा टाकून एक गुन्हाही पथकाने नोंदविला असून, शहनाज जमीर मुजावर (रा. कोकणनगर, रत्नागिरी) या महिलेला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक अतुल पाटील, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, जवान विजय हातिसकर, करणसिंग घुणावत, राम पवार, महिला जवान अनिता डोंगरे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)