निमतवाडी येथील ५ बागांना आग
By Admin | Updated: February 7, 2015 00:14 IST2015-02-06T22:58:42+5:302015-02-07T00:14:44+5:30
मोहोर करपला : १० लाखांच्या नुकसानीचा अंदाज

निमतवाडी येथील ५ बागांना आग
शिरगांव : देवगड तालुक्यातील शिरगांव-निमतवाडी येथील दातरीचे भरडमध्ये पाच शेतकऱ्यांच्या आंबा-काजू बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून १० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.ओंबळ काझरवाडी रस्त्याला लागूनच निमतवाडी येथील शेतकऱ्यांच्या आंबा, काजूच्या बागा आहेत. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्यानजीक लागलेली आग हळूहळू बागायतीमध्ये पोहोचली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. बागायती आणि शेतकरी यांच्या घरामध्ये सुमारे दोन किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आग लागल्याचे समजेपर्यंत बहुतांश झाडे होरपळली होती. हातातोंडाशी आलेले उत्पन्न आगीत गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. दरम्यान शिरगांव-शेवरेचे सरपंच अमित साटम, तलाठी मधुकर बांदेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)
बागेबरोबर कुंपणही जळून खाक
या घटनेत दिलीप आईर यांच्या दोन बागांतील १८ वर्षांची १३० कलमे व १० काजू कलमे मोहरलेल्या स्थितीत पूर्णपणे होरपळली तर काही झाडांवर आंबा, काजू लागलेले होते. पुंडलिक सीताराम आईर यांची ३० कलमे व १०० काजू, मोतीराम शिवराम आईर यांची ५० आंबा व काजू कलमे, धाकू सीताराम राणे यांची सुमारे १५० काजू कलमे, काशिराम बापू पवार यांची २० वर्षांची १० कलमे, चंद्रकांत बयाजी जांभळे यांची गेल्या वर्षीच लागवड केलेली १० काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीची माहिती समजताच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तरी आग सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत धुमसत होती. या पाच बागायतींची कुंपणेही जळून खाक झाली.