प्रभाग १० ची लढत लक्षवेधी
By Admin | Updated: October 30, 2015 22:45 IST2015-10-30T22:45:34+5:302015-10-30T22:45:34+5:30
भाजप शहराध्यक्षांसमोर तिघांचे तगडे आव्हान

प्रभाग १० ची लढत लक्षवेधी
दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. १० मध्ये चौरंगी लढत होत असून, येथून भाजपचे शहराध्यक्ष चेतन चव्हाण निवडणूक लढवित असल्याने भाजपसाठी हा प्रभाग प्रतिष्ठेचा बनला आहे. तर काँग्रेसचे प्रवीण झालबा यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. मात्र, असे असले तरी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार पांडुरंग तळणकर व मनसेचे जीवन सावंत यांनी निवडणुकीच्या रिंंगणात एन्ट्री केल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे तळणकर आणि सावंत यांना मिळणाऱ्या मतांच्या बेरीज-वजाबाकीवरच चव्हाण व झालबा यांचे भवितव्य अवलंबून आहे.
ओंकार कॉलनी आणि हनुमान कॉलनीचा समावेश प्रभाग क्र. १० मध्ये आहे. याठिकाणी पूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना एकसंघ असलेल्या प्रभागातून भाजपाच्या उमेदवार म्हणून चेतन चव्हाण यांच्या मातोश्री मनीषा चव्हाण ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर प्रभाग रचना बदलल्याने ओंकार कॉलनी व हनुमान कॉलनी असा नवीन प्रभाग निर्माण झाला. त्यामुळे या प्रभागातून भाजपाचे शहराध्यक्ष चेतन चव्हाण निवडणूक लढवित आहेत. एक तरूण व तडफदार कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे शहराध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. युवा वर्गात नेहमी सहभागी होणारा चेहरा अशी त्यांची ओळख असल्याने चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे या जनसंपर्काचा फायदा त्यांना होऊ शकतो. तर काँग्रेसचे प्रवीण झालबा हे राजकारणात नवखे आहेत. परंतु तरीसुध्दा काँग्रेसचे सर्व ताकदीनीशी पाठबळ त्यांना लाभल्याने आणि बांधकाम क्षेत्राशी निगडीत त्यांचा व्यवसाय असल्याने त्याचा फायदा त्यांना येथे होऊ शकतो. याचठिकाणी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार पांडुरंग तळणकर अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. ते पेशाने शिक्षक असल्याने त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे. प्रभाग क्र. १० मध्ये शिक्षक, डॉक्टर असा बुध्दजीवी मतदार वर्ग आहे. त्यामुळे त्यांना कॅपचर करण्यात तळणकर यांना यश येऊ शकेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. तर मनसेचे जीवन सावंत हे सुध्दा नवखे असले, तरी शिवसेनेत असताना याच प्रभागात त्यांनी अंतर्गत रस्त्यासाठी निधी आणून मतदारांचे लक्ष स्वत:वर केंद्रीत करून घेतले आहे. त्यामुळे येथे चौरंगी लढत होणार असल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)