शिक्षकाविरुद्ध उपोषण करण्याचा इशारा
By Admin | Updated: January 5, 2015 22:05 IST2015-01-05T21:29:19+5:302015-01-05T22:05:26+5:30
वरवडे ग्रामस्थांचे निवेदन : ठरल्याप्रमाणे कार्यवाही न केल्यामुळे नाराज

शिक्षकाविरुद्ध उपोषण करण्याचा इशारा
कणकवली : तालुक्यातील वरवडे शाळा नं. १ मध्ये कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक प्रदीप मांजरेकर यांच्या कार्यपद्धतीविरोधात गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी दिला आहे.
या शिक्षकामुळे शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांना त्रास होत आहे. त्यामुळे या शाळेतून त्यांना १५ दिवसांत अन्यत्र कामगिरी न दिल्यास विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ उपोषण करतील, असे निवेदन गटशिक्षणाधिकारी अनिल कांबळे यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश घाडीगांवकर आणि ग्रामस्थांनी दिला आहे.
वरवडे शाळा नं. १ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष घाडीगांवकर, आबा शिवडावकर, अजय घाडीगांवकर, दिनकर चव्हाण, विजय कडुलकर, वरवडेचे उपसरपंच आनंद घाडीगांवकर यांच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली आणि निवेदन सादर केले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य महेश गुरव उपस्थित होते.
बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवामध्ये समूहनृत्य तसेच समूहगान स्पर्धेत भाग घेण्यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत चर्चा केली होती. या बैठकीत ठरल्यानुसार कार्यवाही होणे आवश्यक होते. मात्र, तसे न होता अंगणवाडी मदतनीससह काही महिलांना गावातील ग्रामस्थांकडे पैसे जमा करण्यास पाठविण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समितीने याला आक्षेप घेत तातडीने बैठक बोलावली. मात्र, मांजरेकर यावेळी रजेवर होते. शाळा व्यवस्थापन बैठकीत जमा केलेले पैसे परत करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. त्यानंतर बिडवाडी केंद्रस्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये वरवडे शाळा नं. १चा समहूनृत्य व समूहगीत गायनासाठीचा संघ सहभागी झाला नाही. याची जबाबदारी मांजरेकर यांच्यावर होती.
मांजरेकर यांच्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत असून त्यांना आमच्या शाळेतून वरवडे गाव वगळून इतरत्र कामगिरीवर पाठवा. (वार्ताहर)
गटशिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले
गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरवडे शाळा नं. १ मध्ये कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक प्रदीप मारुती मांजरेकर यांची कार्यपद्धती योग्य नसल्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत असून त्यांना आमच्या शाळेतून वरवडे गाव वगळून इतरत्र कामगिरीवर काढण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी केली आहे.