पैसे हडपण्याचा प्रयत्न शेती मित्रांनी उधळला
By Admin | Updated: January 14, 2015 00:33 IST2015-01-13T23:04:06+5:302015-01-14T00:33:36+5:30
शेतकरी सध्या शांत आहेत. मात्र, वस्तूएवढ्या किमतीचे पैसे घेतले, तर आम्ही गप्प बसू, अन्यथा आंदोलन छेडू

पैसे हडपण्याचा प्रयत्न शेती मित्रांनी उधळला
सावंतवाडी : पाणलोट विभागाच्या ‘आत्मा’ सदस्यांतून ४२ शेतकऱ्यांची २०१३ व २०१४ मध्ये ‘शेती मित्र’ म्हणून निवड करून त्यांना नागरपूर सहलीला नेले होते. मात्र, शेतकऱ्यांना स्वत:चेच पैसे खर्च करण्यास लावून त्यांच्यासाठी शासनाकडून आलेले पैसे परस्पर हडप करण्याचा डाव शेती मित्रांनी उधळून लावला असून, या शेतकऱ्यांना आता प्रत्येकी २ हजार २१६ रुपये वस्तू स्वरुपात मिळणार आहेत.तालुक्यातील ४२ शेतकऱ्यांना ‘आत्मा’ अंतर्गत कृषी सहलीसाठी नागपूर येथे नेण्यात आले होते. यासाठी शासन निधीतून निम्मा खर्च तसेच नेण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा स्वत:चा निम्मा खर्च, अशी अट घालण्यात आली होती. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी सहलीसाठी गेल्यावर स्वत:चे पैसे खर्च केले. मात्र, कृषी विभागाने एक रुपयाही खर्च केला नाही. तसेच नागपूर येथे सहलीसाठी नेलेल्या शेतकऱ्यांना शेती अभ्यास दौऱ्यासाठी फिरवण्याऐवजी धर्मस्थळे दाखविण्यात आली. या दरम्यान त्यांना एका धर्मशाळेत ठेवण्यात आले होते.सहल सावंतवाडीत परतल्यानंतर शेतकऱ्यांनी खर्चाचा हिशेब मागितला. त्यावेळी कृषी अधिकारी आय. डी . गुरव व इतर अधिकाऱ्यांनी शेती मित्रांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत, सर्व पैसे खर्च झाले, आता पैसे कोठून देऊ, अशी उत्तरे देत अनेक वेळा बैठकीतूनच काढता पाय घेतला. त्यामुळे संतप्त शेतीमित्रांनी याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. अखेर सर्व शेतकऱ्यांनी आठवडाभरात आमचे पैसे मिळाले नाहीत, तर उपोषण करण्याचा इशारा २८ डिसेंबर २०१४ रोजी दिला होता.कृषी विभागाच्या अधिकारी स्तरावर याबाबत बैठक झाली. दोन दिवसांपूर्वी शेतीमित्रांना त्यांच्या वाट्याचे २ हजार २१६ रुपये देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. मात्र, हे पैसे वस्तू खरेदीतून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मळगाव येथील दुकानात इंधन चुली आणण्यात येतील, त्या चुली या शेतीमित्रांनी घ्याव्यात आणि त्यांची बिले कृषी विभागाला द्यावीत, नंतरच हे पैसे प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा होतील, असा आदेश काढला आहे. त्यामुळे शेतकरी सध्या शांत आहेत. मात्र, वस्तूएवढ्या किमतीचे पैसे घेतले, तर आम्ही गप्प बसू, अन्यथा आंदोलन छेडू. असा इशारा शेतीमित्रांनी दिला आहे. (प्रतिनिधी)