कालव्याच्या निकृष्ट कामाने शेतकरी चिंतातुर
By Admin | Updated: December 31, 2015 00:28 IST2015-12-30T22:21:37+5:302015-12-31T00:28:50+5:30
अवैध उत्खननावर कारवाईस टाळाटाळ : लागवडीखालील शेतीचे प्रमाण घटतेय; पुनर्सर्वेक्षण करून डागडुजी करणे गरजेचे

कालव्याच्या निकृष्ट कामाने शेतकरी चिंतातुर
गजानन बोंद्रे -- साटेली-भेडशी तिलारी आंतरराज्य प्रकल्पाचा डावा कालवा वारंवार फुटण्याच्या घटनेने या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा झाल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, कालवा फुटीचा धोका डोक्यावर कायमच लटकत राहिल्याने परिसरातील शेतकरी चिंतातुर झाला आहे. येथील लागवडीखालील शेतीचे प्रमाण घटत आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण कालवा कामाचे पुनर्सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणची डागडुजी करण्याची नितांत गरज आहे.
महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने तिलारी प्रकल्प साकारण्यात आला. परिसरातील जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली येण्यासाठी तसेच पाण्याची तहान भागविण्यासाठी डावा कालवा आणि उजवा तीर कालवा यांची बांधणी करण्यात आली. मात्र, त्यावेळी या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात बांधलेल्या कालव्यांच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळले आहे. मात्र, याउलट गोव्यात बांधलेल्या कालव्याचा दर्जा मात्र टिकाऊ असाच आहे. महाराष्ट्र सीमेवरील कालवा परिसरातील शेतकऱ्यांवर कालवा फुटीची टांगती तलवार कायम असून, त्यामुळे येथील शेतकरी चिंतातुर झालेला आहे. कालव्यावर अवलंबून शेती करण्याचा त्यांना अनेक वेळा फटका बसला असून कालवा फुटीनंतर पिकांचे अतोनात नुकसान होते. याअंतर्गत मिळणारी नुकसानभरपाई अत्यल्प अशीच असते. त्यामुळे कालवा परिसरातील विशेषत: महाराष्ट्र सीमेवरील शेतकरी शेतीपासून फारकत घेत आहेत. परिणामी, नापीक बनलेल्या या शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच घाला घातला जात आहे. कालवाफुटीचे प्रकार भविष्यात असेच सुरू राहिल्यास येथील शेती नापीक होईलच, पण त्याचबरोबर शेतकरी उदरनिर्वाहासाठीही बेरोजगार होण्याचा धोका संभवत आहे. सध्या या परिसरातील लावगडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.
कालवा फुटीमुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतात कालव्याची माती जात शेतीचे आणि शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले. रविवारी सकाळी भेडशी काजुळवाडी येथे कालव्याला भगदाड पडले. मात्र, पाण्याची गळती वेळीच तेथील शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने अनर्थ टळला.
अन्यथा कालव्यासह अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असते. सध्या या संपूर्ण कालव्याची अवस्था फारच दयनीय झाली असून, भरावाच्या अनेक ठिकाणी हा कालवा खचला आहे. कालव्याच्या आतून घातलेले सिमेंट काँक्रीट पूर्णपणे उखडून गेल्याने अनेक ठिकाणी भगदाड पडण्यासारखीच स्थिती निदर्शनास येत आहे. या कालव्याच्या पाण्यासाठी हजारो रुपये कर भरून शेतकरी शेती करतात. मात्र, पीक हातातोंडाशी आले असतानाच ऐनवेळी पाण्याचा तुटवडा भासण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
कालव्याच्या पाण्याच्या विश्वासावर कर्ज काढून घेतलेली शेती भविष्यात शेतकऱ्यांचा आत्मघातही करणारी ठरू शकते. त्यामुळे भविष्यात कालवाफुटीच्या घटना वारंवार घडणार नाहीत, याची योग्य दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घेणे महत्त्वाचे आहे.
या संपूर्ण कालव्याला आतून घातलेला सिमेंट काँक्रीटचा थर पूर्णपणे उखडून गेला असल्याने भरावाच्या ठिकाणी त्यातून पाणी झिरपण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. कालवा फुटीचा हा धोका भरावाच्या ठिकाणी जास्त असून, खोदकाम केलेल्या ठिकाणचा धोका त्यामानाने कमी आहे. त्यामुळे कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी करणे गरजेचे आहे. तसेच संपूर्ण कालव्याची साफसफाई करून उखडलेले सिमेंट क्राँक्रीटची दुरुस्ती विशेषत: भरावाच्या ठिकाणी प्रकर्षाने करणे गरजेचे आहे.
कालवा फुटीच्या या घटना थांबविण्यासाठी संपूर्ण कालवा कामाचे पुनर्सर्वेक्षण करण्याची गरज आहे. वरिष्ठ प्रशासनाने याची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
बेकायदेशीर कामांवर कारवाई नाही
डाव्या कालव्याच्या परिसरात आजही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर काळ्या दगडाचे उत्खनन केले जाते. त्यासाठी जिलेटीनचा वापर केला जातो. या सुरुंगस्फोटांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने मोठमोठे स्फोट घडवून आणले जातात. त्यामुळे भोवतालचा संपूर्ण परिसर हादरतो. त्यामुळे या कालव्यांना हादरे बसतात. शिवाय डाव्या कालव्याचा बराचसा भाग उंचावर असून, मोठमोठ्या मोऱ्याही त्याखालून गेल्या आहेत.
उंचीवर भरावाच्या ठिकाणी असलेले कालवे सुरुंग स्फोटाने हादरल्याने त्यांना चिरा जाऊन पाणी झिरपण्याचे प्रकार वाढत आहेत. याबाबत मात्र शासकीय अधिकारी डोळेझाकपणे मूग गिळून गप्प का आहेत? असा सवाल ग्रामस्थांना पडला आहे. तसेच या कालव्यावरून मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक होत आहे. या वाहतुकीवर आजपर्यंत कधीच कारवाई झाली नाही. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांचे धोरण ओळखणे कठीण आहे.
धरणाचा धोकातरी ओळखा
सध्या शिरंगे येथील बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काळ्या दगडाचे उत्खनन केले जाते. हे क्षेत्र मुख्य धरणानजीक असल्याने मुख्य धरणाला येथील भूसुरुंगामुळे हादरे बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात कालवा फुटीप्रमाणे मुख्य धरणालाही भगदाड पडून धरणही फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुुळे हजारो लोकांचा हकनाक बळी जाऊ शकतो. परमे येथे उजव्या तीर कालव्याजवळ खडी क्रशरचा मोठा प्लांट असून, त्यासाठी लागणारा काळा दगड येथील डोंगररांगांतून आणला जातो. त्यावेळच्या भूसुरुंगामुळे येथील कालवा तसेच कालव्याच्या नदीवरील पुलालाही मोठा धोका संभवतो. हा सारा प्रकार स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून केला जातो. परिपूर्ण अशा ‘आर्थिक’ व्यवहारांमुळे असे गैरप्रकार तालुक्यात फोफावत आहेत. यावर वेळीच बंधन घातले नाही तर भविष्यात परिसरातील सामान्य लोकांचे जगणेही कठीण होऊन जाईल. या सर्व परिस्थितीची योग्य पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याबाबत कडक धोरण घेणे आवश्यक आहे.
पिकांच्या नुकसानभरपाईसाठी डोळे पाणावले...
दोन वर्षांपूर्वी खानयाळे येथे भरावाच्या ठिकाणीच कालव्याला भगदाड पडून कालव्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसानही झाले होते.
मात्र, या शेतकऱ्यांना कालवा विभागाने दिलेली नुकसानभरपाई अनेकवेळा मागणी करूनही अवेळी व अत्यल्प अशी मिळाली.
त्यामुळे शेतकऱ्यांना कालव्याच्या पाणी प्रवाहात वाहून गेलेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळविताना नाकीनऊ आले होते. नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचे डोळेही पाणावले होते.