रेल्वेत बनावट तिकिटे
By Admin | Updated: September 26, 2015 00:20 IST2015-09-25T23:43:13+5:302015-09-26T00:20:17+5:30
कोकण रेल्वे : मुंबईतील एजंटाची करामत चार महिन्यांनी उघड

रेल्वेत बनावट तिकिटे
रत्नागिरी : मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव आटोपून कोकण रेल्वेने मुंबईला निघालेल्या काही मुंबईकरांना एजंटांनी केलेल्या फसवणुकीचा फटका बसला. परतीच्या प्रवासात एजंटाने केलेल्या या फसवणुकीमुळे संबंधित प्रवाशांना मानहानी पत्करावी लागलीच, शिवाय दंडासह तिकिटाच्या रकमेएवढ्या फरकाची रक्कम भरण्याचा भुर्दंडही सहन करावा लागला. मंगळवारी (ता. २२) रोजी रात्री गोव्याहून मुंबईकडे निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेस गाडी कणकवली स्थानकात आली. बी-४ या वातानुकूलीत डब्यात विजय कुंटे आणि त्यांचे इतर पाच कुटुंबीय डब्यात चढले. कन्फर्म तिकीट आणि मनाजोगती जागा मिळाल्याने ते खुशीत होते. चार महिन्यांपूर्वी तिकिटासाठी केलेली धडपड सार्थकी लागल्याचे समाधान त्यांच्यासह कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसत होते. याच समाधानात त्यांनी ट्रेन तिकीट एक्झॅमिनर अर्थात कंडक्टरला आपले तिकीट दाखवले. तिकीट तपासल्यानंतर टीटीईने त्यांना दंडासकट साडेपाच हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे कुंटे कुटुंबीय संतापले. टीटीईविरुद्ध कम्प्लेन्ट करण्याची धमकीही त्यांनी दिली. मात्र, टीटीई बधला नाही. त्याला कारणही तसेच होते. प्रवाशाने सादर केलेले ८१३६०६३१०१ या पीएनआर क्रमांकाचे तिकीट आणि टीटीईकडे असलेल्या चार्टवरचा तपशील जुळत नव्हता. तिकिटावर प्रवाशांच्या नावासमोर ५१, ५०, ५६, ३६ आणि ३५ असे वय नमूद करण्यात आले होते, तर टीटीईकडच्या चार्टवर हेच वय अनुक्रमे ११, १०, ५, ६ आणि ५ असे दिसत होते. साहजिकच हे सर्व प्रवासी लहान मुले असल्याचे टीटीईचे म्हणणे होते. तिकिटाची रक्कमही निम्मीच भरल्याचे दिसत होते. राहिलेली निम्मी रक्कम आणि दंड असे एकूण साडेपाच हजार रुपये भरावे, असे टीटीईने सांगितले. त्यावरून डब्यात मोठाच गोंधळ झाला. दंड थोपटले गेले. मात्र टीटीई ठाम राहिल्याने प्रवाशांना दंड भरावाच लागला. माहिती घेतल्यानंतर स्पष्ट झाले की, हे तिकीट कुंटे यांनी लालबाग (मुंबई) येथील एजंटाकडून चार महिन्यांपूर्वी खरेदी केले होते. एजंटाने आयआरसीटीसीमार्फत काढलेल्या या तिकिटाच्या प्रिंंटमध्ये घोळ केला. प्रवाशांना दिलेल्या तिकिटावर योग्य तो तपशील लिहिला. मात्र, आयआरसीटीसीवर नोंद करताना चुकीचा तपशील लिहिला. प्रवाशामागे ३०० रुपये या दराने १८०० रुपये कुंटे यांनी आधीच एजंटाला दिले होते. त्याशिवाय कमी रकमेच्या तिकिटामुळे साडेपाच हजारांचा भुर्दंड सोसावा लागला. त्यामुळे ८३५ रुपयांचे प्रतिमाणसी असलेले तिकीट त्यांना दुपटीहून अधिक रकमेला पडले. पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करून चंद्रकांत कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये कणकवली स्थानकावर चढले. बी-१ डब्यातल्या ५७ क्रमांकाच्या आपल्या आसनापर्यंत ते पोहोचले. बघतात तर तेथे एक प्रवासी आपलीच सीट असल्याच्या थाटात आधीच स्थानापन्न झाला होता. यामुळे चंद्रकांत खवळलेच. त्यांनी त्या प्रवाशाशी हुज्जत घालायला सुरुवात केली. मग दोघांनीही आपापली तिकिटे एकमेकांना दाखवली आणि दोघेही चक्रावलेच. कारण दोघांच्याही तिकिटावर एकच आसन क्रमांक लिहिलेला होता. अखेर दोघांनीही टीटीईकडे धाव घेतली. टीटीईने चार्ट पाहिला आणि आधीच बसलेल्या प्रवाशाचे तिकीट अधिकृत असल्याचे सांगून त्याच्या बाजूने कौल दिला. तिकिटावरचा आणि चार्टवरचा तपशील जुळत नव्हता. त्यामुळे चंद्रकांत संतापले. ‘एकाच सीटचे तिकीट दोघांना देऊन रेल्वेने एसटीसारखाच घोळ घातला आहे. ते काही मला माहीत नाही. मला माझी सीट द्याच’, असा आग्रह त्यांनी धरला. अखेर टीटीईने त्यांचे तिकीट तपासले. पीएनआर ८७३४९१९४९२ क्रमांकाच्या या तिकिटाची खातरजमा त्यांनी रेल्वेच्या १३९ या क्रमांकावर केली. तेव्हा उत्तर आले की, या हे तिकीट दुसऱ्या दिवशी सुटणाऱ्या गाडीचे आहे! चंद्रकांत यांना एजंटने दिलेले तिकीट बनावट होते. खऱ्या पीएनआरचे दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाचे तिकीट दुसऱ्याच प्रवाशाला विकले गेले होते. चंद्रकांत यांना अखेर माघार घ्यावी लागली. गणेशोत्सव आटोपून पुन्हा मुंबईला जायचा प्रवास सुखाचा व्हावा, म्हणून तिकिटाच्या ८३५ रुपयांपेक्षा जादा ३०० रुपये देऊन त्यांनी चार महिन्यांपूर्वी हे तिकीट खरेदी केले होते. सुखाच्या प्रवासाचा त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. आपण एजंटाकडून फसवलो गेलो आहोत, हे समजेपर्यंत रत्नागिरी स्थानक आले होते. एजंटाला भरलेले ते सर्व पैसे गेलेच, पण विनातिकीट प्रवासी समजून संपूर्ण तिकिटाचे पैसे आणि दंडाची रक्कम मिळून जादा १२०० रुपये त्यांना भरावे लागले. कोकणकन्या एक्स्प्रेस या सर्वाधिक लोकप्रिय गाडीत एकाच दिवशी केवळ वातानुकूलित डब्यात अशा पद्धतीने सहा तिकीटधारक प्रवाशांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. (प्रतिनिधी) तिकीटाची खात्री करावी प्रवाशांनी तिकिटाची खात्री करावी. रेल्वेने परवाना देऊन अधिकृतपणे सिटी बुकिंगसाठी एजंट नेमले आहेत. त्यांच्याकडून अशी फसवणूक होण्याची शक्यता नाही. आयआरसीटीसीवरून सहज तिकिटे मिळत असल्याने अनधिकृत एजंट अशा तऱ्हेची फसवणूक करू शकतात. प्रवाशांनी तिकीट ताब्यात घेतल्यानंतर पीएनआरच्या मदतीने वेबसाईटवरून किंवा मोबाईलद्वारे एसएमएसवरून आपल्या तिकिटांची आणि इतर तपशिलाची खात्री करून घ्यावी. तसे केल्यासच अशा तऱ्हेची फसवणूक टळू शकेल. फसल्या गेलेल्या प्रवाशांनी रेल्वेशी संपर्क साधल्यास एजंटाचा तपास करून कारवाई करता येऊ शकेल. खासगी एजंटांकडून तिकीट खरेदी केलेल्या मुंंबईकडे जाणाऱ्या सर्वच चाकरमान्यांनी आपल्या तिकिटाची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. - बाळासाहेब निकम, आरआरएम, कोकण रेल्वे. फसवणूक रेल्वेच्या पथ्यावर? प्रवाशांची अनधिकृत एजंटांकडून झालेली ही फसवणूक एक प्रकारे रेल्वेच्या पथ्यावरच पडली आहे. एकदा गाडीत चढलेले प्रवासी गाडीतून उतरण्याच्या आणि गर्दीच्या गाडीतून पुन्हा प्रवासाचे दिव्य करण्याच्या मनस्थितीत नसतात. ते प्रवासी दंड आणि फरकाची रक्कम भरून त्याच गाडीने प्रवास करण्याला पसंती देतात. झोपायला किंवा बसायला जागा नसली, तरी त्यांची हरकत नसते. अशा स्थितीत प्रवाशाला सीट न देताच दंड आणि तिकिटाची रक्कम रेल्वेला आपसूकच मिळत असते. दोन्ही तिकिटांवर एकच मोबाईल फसवणूक झाल्याचे उघड झालेल्या आणि एकमेकांना ओळखत नसलेल्या दोन वेगवेगळ्या प्रवाशांच्या तिकिटावर प्रवाशाचा मोबाईल क्रमांक या रकान्यात एकच क्रमांक आहे. संबंधित मोबाईल क्रमांकावर फोन लावल्यास तो उचलला जात नाही. तसेच परळ (पूर्व), मुंबई हा एकच पत्ता त्या दोन्ही तिकिटांवर आहे, हे सारेच संशयास्पद असल्याने याची चौकशी करावी.