पाईप लाईनच्या कामात त्रुटी
By Admin | Updated: January 10, 2015 00:14 IST2015-01-09T21:58:45+5:302015-01-10T00:14:36+5:30
आढावा बैठक : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हापसेकरांचा आरोप

पाईप लाईनच्या कामात त्रुटी
सावंतवाडी : तिलारी ते वेंगुर्लेकडे जाणाऱ्या नळपाणी योजनेच्या कामात मोठ्या त्रुटी आहेत. दोडामार्गमधील ज्या रस्त्यावरून पाईपलाईन घातली जात आहे, त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडू शकतात. याबाबत संबंधित ठेकेदाराला विचारण्यास गेल्यावर ते खोटेनाटे घाणेरडे आरोप करतात, अशा अनेक तक्रारी दोडामार्गचे जिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केल्या.
सावंतवाडी विश्रामगृहावर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर, सभापती महेश गवस, आनंद रेडकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, बांधकाम अभियंता प्रकाश शिंदे, जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी तसेच खारभूमीचे अभियंता संदीप फुदे, तहसीलदार सतीश कदम आदी उपस्थित होते.
यावेळी प्रथम खारभूमीबाबत चर्चा झाली. या चर्र्चेतून खारभूमीची ५० कोटीची कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
तसेच त्यानंतर तिलारीहून वेंगुर्लेकडे जाणाऱ्या पाईप लाईनच्या कामाबाबत राजन म्हापसेकर यांनी आपली भूमिका मांडली. यात कंपनी योग्य पध्दतीने काम करीत नाही. तसेच ज्या रस्त्यावरून पाईप लाईन टाकण्यात येत आहे, त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे मारले जात असून ते बुजविले जात नाहीत आणि जाब विचारल्यास उध्दट उत्तरे ऐकण्यास मिळतात, अशा तक्रारी करत, जर पावसात एखादा जरी अपघात झाल्यास काम होणार नाही, असा इशारा यावेळी म्हापसेकर यांनी दिला.
यावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, यापुढे काम करताना स्थानिकांना विश्वासात घेतले जाईल. तसेच कामावर जीवन प्राधिकारण तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी आपला प्रतिनिधी ठेवतील. रस्ता खोदाई केली, तर त्याबाबतचे पैसे कंपनीने बांधकाम विभागाकडे भरले असून, ज्या ठिकाणी रस्ता खोदाई झाली, तेथे रस्ता योग्यप्रकारे केला जाईल, असे आश्वासन कंपनीने दिल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
आरोपाबाबत खेद
जिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला खेद वाटतो. ते चांगले काम करीत असून अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा आदर केला पाहिजे, त्यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवू नये, अशा कडक सूचना यावेळी दीपक केसरकर यांनी बैठकीत दिल्या.