पावसाळ्यात सुकाळ, उन्हाळ्यात दुष्काळ

By Admin | Updated: January 10, 2015 00:11 IST2015-01-09T20:45:28+5:302015-01-10T00:11:26+5:30

दोडामार्गातील स्थिती : नियोजनाचा अभाव; ओहोळांवर छोटे-मोठे बंधारे बांधण्याची गरज

Dusk in the rainy season, summer | पावसाळ्यात सुकाळ, उन्हाळ्यात दुष्काळ

पावसाळ्यात सुकाळ, उन्हाळ्यात दुष्काळ

वैभव साळकर - दोडामार्ग -दोडामार्ग तालुक्यात पर्जन्याचे प्रमाण अधिक असूनही के वळ पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने दरवर्षी तालुक्याला उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्यावर्षीदेखील पाणीटंचाईला तालुक्यातील जनतेला सामोरे जावे लागले. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई भासू नये, यासाठी शासनाने आतापासूनच गावोगावच्या वाडी-वस्तींतून वाहणाऱ्या ओहोळांवर छोटे-मोठे बंधारे घालून पाणी अडविण्याबाबत नियोजन केले पाहिजे. त्यासाठी पुन्हा एकदा ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम गावोगावी राबविणे आवश्यक आहे.
मागच्या उन्हाळ्यावर दृष्टिक्षेप टाकल्यास काही गावांना फक्त पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागली होती. मांगेली, उसप, खोक्रल, तेरवण-मेढे, आंबडगाव, वझरे, आदी गावांना पाणी टंचाईचा मोठा फटका बसला. तर तालुक्यातील अन्य गावांनादेखील थोड्या फार प्रमाणात झळ बसली आहे.
दोडामार्ग तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही वारंवार पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. कारण पाण्याचे योग्य नियोजन करण्याचा कटाक्षाने विचार केला जात नाही. संभाव्य पाणी टंचाईचे संकट आतापासूनच समोर ठेवत गावागावातील ओहोळांवर, ओढ्यांवर बंधारे बांधले पाहिजेत. मध्यंतरी पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून शासनाकडून बंधारे बाधण्यासाठी दिला जाणारा निधी पून्हा चालू करत लोकांना बंधारे बांधून पाणी अडविण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
गतवर्षी तालुक्यातील काही शाळा व ग्रामस्थांनी मिळून ओहोळाचे पाणी अडविण्यासाठी छोटे बंधारे घातले. परिणामत: काही प्रमाणात पाणी भूगर्भात जिरविणे शक्य झाले व उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर थोड्या प्रमाणात तरी मात करता आली. त्यामुळे शासन मदत करेल किंवा निधी उपलब्ध करून देणार यावर अवलंबून किंवा याचा विचार करत न राहता आतापासूनच गावागावांतील, वाड्यावाड्यांतील ग्रामस्थांनी एकत्र येत ओहोळांवर बंधारे घालणे आवश्यक आहे. जेणेकरून या अडविलेल्या पाण्याचा पुढे त्यांनाच उन्हाळ्यात उपयोग होईल, या विचाराने काम करणे गरजेचे आहे. गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन हे काम केल्यास एका दिवसांत हा बंधारा उभा राहू शक तो.


पावसाळ्यानंतर नदीवाटे वाहून जाणारे पाणी अडविण्यासंदर्भात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. बचत गट, स्वयंसेवी संस्था,आदींच्या माध्यमातून कच्चे बंधारे बांधून पाणी अडविण्याची गरज आहे. यासाठी जनमानसांत प्रबोधन होणे आवश्यक आहे.
- आनंद कामत, सामाजिक कार्यकर्ते, दोडामार्ग.


ग्रामस्थांच्या आशेवर ‘पाणी’
गेली तीन चार वर्षे तालुक्यातील ग्रामस्थ शासन मदत करेल या आशेवर होते, मात्र ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम राबविणे बंद केल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. यात ग्रामस्थांनी शासनाच्या धोरणांवर अवलंबून न राहता ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम हाती घेतला पाहिजे. त्याचवेळी गावागावांतील विहिरींमधील पाणी आटणार नाही. झऱ्यांचा ओलावा टिकून राहील. उन्हाळयातही शेती करता येईल आणि यातूनच उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई कमी होईल, हे लक्षात ठेवत गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Web Title: Dusk in the rainy season, summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.