नाटळ तांबेवाडीतबिबट्याचा संचार
By Admin | Updated: July 20, 2014 22:15 IST2014-07-20T22:00:35+5:302014-07-20T22:15:35+5:30
पंधरा दिवसशेतकरी भयभीत

नाटळ तांबेवाडीतबिबट्याचा संचार
कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ तांबेवाडी येथील शेतकरी रघुनाथ राणे यांचा एक बैल बिबट्याने ठार करून त्यांच्या गाईला जखमी केले आहे. येथील परिसरात गेले पंधरा दिवस बिबट्याचा मुक्तसंचार असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. वनविभागाने याबाबत दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
येथील तांबेवाडी ही जंगलमय भागापासूननजिक आहे. हिंस्त्र प्राण्यांचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असतो. मे महिन्यामध्ये येथील शेतकरी विठोबा गोविंद परब यांच्या गायीवर वाघाने झडप घालून जबर जखमी केले होते. दरवर्षी येथील शेतकऱ्यांच्या एक ना एक जनावरांवर बिबट्या हल्ला करतो. रघुनाथ राणे यांचा वाडा जंगलापासून जवळच आहे. नेहमीप्रमाणे राणे यांनी सकाळी आपली गुरे चरावयास सोडली. काहीवेळाने राणे न्याहरी करण्यासाठी घरी आले. न्याहरी करून पुन्हा जनावरे राखण्यासाठी गेले असता जनावरे सैरावैरा पळू लागली. एक बैल सोडून सर्व जनावरे असल्याचे राणे यांच्या लक्षात येताच त्यांनी बैलाचा शोध सुरू केला. जवळच्याच एका झुडपाखाली बैलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते. राणे यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने पळ काढला. तसेच एका गायीलाही जखमी केले. राणे यांनी इतर जनावरे घेऊन घर गाठले. याबाबत त्यांनी शेजारी राहणारे प्रताप राणे यांना सांगितले. प्रताप राणे यांनी दूरध्वनीवरून घटनेची कल्पना वनविभागाला दिली. हे वृत्त समजताच वनविभागाचे कर्मचारी कांबळे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून त्यांनी १५ हजार रूपये रकमेचा बैल असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. संबंधित खात्याने या घटनेची दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)