देवस्थानचा जमीनप्रश्न मार्गी लावणार
By Admin | Updated: July 20, 2015 00:07 IST2015-07-19T21:42:22+5:302015-07-20T00:07:20+5:30
वैभव नाईक : आचरा ग्रामस्थांशी समस्यांवर केली चर्चा

देवस्थानचा जमीनप्रश्न मार्गी लावणार
आचरा : आचरा गावाचा उभा राहिलेला देवस्थान जमीनप्रश्न सोडवण्यासाठी आपण ग्रामस्थांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असून देवस्थान जमीनप्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याशी आचरा ग्रामस्थांबरोबर बैठक घेवून देवस्थान जमीन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले.
यावेळी सरपंच मंगेश टेमकर, राजन गावकर, समीर हडकर, अरुण आपकर, शामसुंदर घाडी, विनायक परब, रेश्मा कांबळी, बबन सक्रू, उदय दुखंडे, अरविंद घाडी, जगदीश पांगे आदी उपस्थित होते. यावेळी आचरा ग्रामस्थांनी आमदार नाईक यांच्याकडे देवस्थान जमीनविषयक समस्या मांडल्या. यावेळी माजी उपसरपंच अरुण आपकर यांनी बेदखल कुळाबाबत लक्ष वेधले.
आचरा पारवाडी भागातील ७० ते ७५ शेतकरी हे शेकडो वर्षे जमीन कसत असून त्यांची सातबारावर नावे नाहीत. शेकडो वर्षे जमीन कसूनही कूळ म्हणून नाव नसल्याने या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. या शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जातील अशी त्यांनी भीती व्यक्त केली.
यावेळी जगदीश पांगे यांनी कमिटीदार हे पैसे मागत असल्याचा आरोप करत म्हणाले, आम्ही ग्रामपंचायतीकडून रितसर परवानगी घेऊन इमारत बांधली. असे असूनही देवस्थान कमिटी आमच्यावर केसेस टाकत असून प्रत्येक स्क्वेअर फुटमागे ५०० रुपयांची मागणी करत आहेत. कोणताही अधिकार नसताना जमीन एनए करुन देण्याचे आश्वासन देत आहेत. या सगळ्याचा विचार करुन आमदारांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीने जमीनप्रश्नी चर्चा करण्याचे सांगत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येऊ देणार नसल्याचे आश्वासन देत आचरा गावाच्या विकासासाठी आपण बांधील असून देवस्थान जमीनमुळे निर्माण झालेले, जमीन तारण खरेदी-विक्री, जमीन एनए करण्याचे प्रश्न शासन स्तरावर तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार नाईक यांनी आचरा जिल्हा परिषद विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन विकासकामाबाबत चर्चा
केली. (वार्ताहर)