रेल्वेमंत्र्यांना विविध संस्था, राजकीय पक्ष, संघटनांची निवेदने

By Admin | Updated: January 13, 2015 00:15 IST2015-01-12T22:29:00+5:302015-01-13T00:15:02+5:30

लक्ष घालण्याचा आग्रह : कणकवली, देवगड, जामसंडेमध्ये विविध समस्यांबाबत सुरेश प्रभू यांचे लक्ष वेधले

Details of various organizations, political parties, organizations of railways | रेल्वेमंत्र्यांना विविध संस्था, राजकीय पक्ष, संघटनांची निवेदने

रेल्वेमंत्र्यांना विविध संस्था, राजकीय पक्ष, संघटनांची निवेदने

कणकवली/देवगड/जामसंडे : रेल्वे मंत्री सुरेश प्रभू दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी जिल्ह्यातील विविध संघटना, संस्था, देवगड तालुका राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, देवगड मनसेचे पदाधिकाऱ्यांनी सुरेश प्रभू यांचे विविध समस्यांबाबत लक्ष वेधले. देवगड, कणकवली, जामसंडे येथे प्रभूंना निवेदने देण्यात आली.जिल्ह्याच्या विकासाला नवीन दिशा मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष नंदूशेठ घाटे यांनी रेल्वमंत्र्यांकडे अनेक शिफारशी पत्राद्वारे केल्या. जामसंडे येथे राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी विविध मागण्या केल्या.देवगड तालुक्यातील मुलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा आग्रह पत्राद्वारे केला. विविध प्रकल्पांमुळे देवगड तालुका नावारूपास येत आहे. महाराष्ट्रातील मुख्य बंदरांपैकी देवगड हे सुरक्षित बंदर आहे. तालुक्यातील मासेमारीवरती अनेक कुटुंबांचा संसार चालत आहे. आनंदवाडी येथील प्रकल्पाचे काम ५० टक्के पूर्णत्वास आले असून दगड, माती भरावाचे काम झाले आहे. स्थानिक मच्छिमारांच्या सुचनेनुसार मासेमारी प्रकल्पाच्या मूळ आराखड्यामध्ये बदल सुचविल्याप्रमाणे बेंगळूर येथील सीआयएसएफ या संस्थेने सुधारीत आराखडा आक्षेपार्ह भाग वगळून तयार केला आहे. हा आराखडा मच्छिमारांना व संघटनांना मंजूर असल्याचे घाटे यांनी पत्रात नमूद केले आहे.
हा प्रस्तावाचा आराखडा बदलल्याने ९२ कोटींचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने केंद्राच्या अर्थ खात्याकडे निधी उपलब्ध होण्यासाठी पाठविलेला आहे. हा निधी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. तरी या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी घाटे यांनी पत्राद्वारे दिली आहे.
याचबरोबर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई दूर व्हावी, जीर्ण झालेल्या वाहिन्या अपुरा पाणीपुरवठा यावरती तोडगा काढून देवगडमधील जनतेला पाण्याचा साठा मुबलक मिळावा अशी मागणीही केली.
वाढत्या लोकसंख्येबरोबर पिण्याच्या पाण्याचा तुटवडा कायम आहे. तालुक्याला समुद्रकिनारा लाभल्याने गोड्या पाण्याचे स्त्रोत अल्प प्रमाणात आहेत. देवगड शहर प्रामुख्याने प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहेत. पाईप जीर्ण झाल्याने त्यामधून सातत्याने गळती होऊन किंवा मोटारपंप बिघडून, वीज खंडित होते अशा अनेक समस्या आहेत. यामुळे देवगड नळयोजनेला अग्रक्रम देण्यासाठी घाटे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
याचबरोबर तालुक्यातील विजयदुर्ग बंदर हे भविष्यात विकसित होणारे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. याठिकाणी ऐतिहासिक किल्लाही आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने विजयदुर्ग-कोल्हापूर असा नवीन रेल्वेमार्ग प्रस्थापित करून पर्यटनाला व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळून स्थानिक तरुणांना रोजगारही उपलब्ध होईल. तालुक्यातील आंबा व्यवसाय तेजीत असल्याने नांदगांव येथे रोरो सेवेला थांबा मिळावा. यामुळे नांदगांव रेल्वेस्टेशनही विकसित होईल. यामुळे तालुुक्यातील हापूस मुंबई येथे कमी दरात व कमी वेळेत जावू शकेल अशा मागण्या घाटे यांनी केल्या. (प्रतिनिधी)

बोर्डवे रेल्वे स्टेशन संघर्ष समिती
बोर्डवे रेल्वे स्टेशन दशक्रोशी संघर्ष समितीने बोर्डवे या ठिकाणी कोकण रेल्वेचे प्रस्तावित स्टेशन व्हावे, अशी मागणी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. बोर्डवे या ठिकाणी रेल्वे स्टेशन झाल्यास परिसरातील ओसरगाव, बोर्डवे, आंब्रड, कुंदे, पोखरण, कुसबे, घोडगे, भरणी, कुपवडे, सोनवडे, जांभवडे, कळसुली, कसवण व तळवडे आदी गावांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच मे महिना, गणपती, दिवाळी आदी सणांसाठीही येथील ग्रामस्थांना फायदा होऊ शकतो. या निर्णयामुळे लोकांचा काळ, वेळ व पैसा वाचणार आहे.
देवगड तालुका मनसे संघटना
कोल्हापूर ते विजयदुर्ग असा रेल्वेमार्ग निर्माण करावा, अशी मागणी मनसेचे देवगड तालुकाध्यक्ष लक्ष्मण तारी यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे रविवारी केले. जामसंडेमधील सुरेश प्रभू यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात लक्ष्मण तारी यांनी या मागणीचे निवेदन सुरेश प्रभू यांना दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी देवगड तालुक्यातील विजयदुर्ग आणि देवगड या बंदरांना विकसित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोल्हापूर ते विजयदुर्ग असा रेल्वे मार्ग निर्माण होणे आवश्यक आहे. कुडाळ, मालवण, देवगड, वैभववाडी या तालुक्यांमध्ये रेल्वेमार्ग झाल्यास त्या ठिकाणी लोकल ट्रेन चालविणे सोपे जाईल आणि पर्यायाने सिंधुदुर्गच्या विकासास चालना मिळेल, अशा मागणीचे निवेदन लक्ष्मण तारी यांनी सुरेश प्रभूंना यावेळी दिले.
देवगड तालुका पटेल समाज
देवगड तालुका पटेल समाजातर्फे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. रविवारी सुरेश प्रभू यांचा जामसंडेमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी हे निवेदन पटेल समाजातर्फे सुरेश प्रभू यांना देण्यात आले. गुजरात राज्यात जाणारी गांधीधाम एक्सप्रेस न्यू भूजपर्यंत विस्तारीत करावी. मेंगलोर किंवा मडगावहून न्यू भूजपर्यंत नवीन रेल्वे सुरू करावी आणि या दोन्ही गाड्यांना कणकवली येथे थांबा मिळावा, अशा प्रामुख्याने यावेळी मागण्या करण्यात आल्या. मेंगलोरपासून रायगडपर्यंत व्यवसायानिमित्त पटेल समाजातील लोक स्थायिक झाले आहेत. त्यांना आपल्या गुजरात राज्यातील मूळ गावी जाण्यास या गाड्यांमुळे सोयीचे ठरणार असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Details of various organizations, political parties, organizations of railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.