काम करायचे नसल्यास पदत्याग करा
By Admin | Updated: November 22, 2014 00:06 IST2014-11-21T23:49:59+5:302014-11-22T00:06:34+5:30
नारायण राणे : जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना इशारा

काम करायचे नसल्यास पदत्याग करा
कणकवली : पक्ष संघटना वाढविण्यासाठी ज्यांना काम करायचे नसेल त्यांनी पदे सोडून बाजूला व्हावे. प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा कोणीही प्रयत्न केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. एका पराभवामुळे सर्व काही संपत नाही. त्यामुळे पराभवानंतर आता थांबू नका. जनतेच्या सेवेसाठी संघटितपणे कामाला लागा, असे आवाहन काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना केले. ओसरगाव येथील महिला भवन सभागृहात आज, शुक्रवारी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीच्या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आमदार नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, पक्ष प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप कुडतरकर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले नारायण राणे नेमके काय बोलणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे सभागृह खचाखच भरले होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना नारायण राणे म्हणाले, पराभवाविषयी मी काही बोलू इच्छित नाही.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी काम करा
पक्ष वाढविताना ज्यांना पक्षात काम करायचे नाही त्यांनी बाजूला व्हावे. पराभवामुळे माझा दरारा आणि आब कमी होणार नाही. मात्र, तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल हे लक्षात घ्या. विकासकामांसाठी ठामपणे जनतेच्या मागे कोण उभा राहतो, हे जनतेला समजेल. त्यामुळे पराभवानंतर थांबू नका. कार्यरत रहा. जिल्हा बँक निवडणुकीसाठी पक्षाच्या बॅनरखाली एकत्र येऊन काम करा. निश्चितच विजय आपला असेल, असेही राणे यांनी सांगितले.