गरम पाण्यासह वाफ घशात गेल्याने मृत्यू
By Admin | Updated: February 12, 2015 00:38 IST2015-02-11T21:58:53+5:302015-02-12T00:38:58+5:30
श्वसननलिकेतील इजा एवढी वाढली की, त्यांना श्वास घेणे अशक्य झाले व उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

गरम पाण्यासह वाफ घशात गेल्याने मृत्यू
सातारा : लग्नाच्या वाढदिवशी घरगुती अपघातात प्राण गमवावे लागण्याचे दुर्दैव येथील विजय नरहरी क्षीरसागर (गुरव) (वय ३८, रा. कवठे, ता. वाई) यांच्या वाट्याला आले. वाफ आणि गरम पाणी श्वासनलिकेत जाऊन त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी गुरव हे बंब पेटवत होते. या बंबात कॉईलच्या वरच्या भागात कागद पेटत ठेवला असता आतून पाणी फिरवले की लगेचच तापलेले पाणी खालील बाजूने बाहेर येते. मात्र, पाणी बाहेर येईना, हे लक्षात आल्यावर त्यांनी बंबाच्या खालील बाजूस रबरी पाईपचा तुकडा जोडला व तोंडाने हवा ओढली. त्याच वेळी पाईपमध्ये अडकलेला कचरा व वाफेसह गरम पाणी जोराने गुरव यांच्या तोंडात गेले. त्यामुळे त्यांच्या श्वसननलिकेला इजा झाली. यानंतर ते वाई येथील रुग्णालयात दाखल झाले; परंतु श्वसननलिकेतील इजा एवढी वाढली की, त्यांना श्वास घेणे अशक्य झाले व उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.