विज्ञानाचा दैनंदिन वापर अत्यावश्यक
By Admin | Updated: December 25, 2014 00:06 IST2014-12-24T23:18:58+5:302014-12-25T00:06:06+5:30
मुक्ता दाभोलकर : भारतीय संविधानाला प्रमाण मानून कार्य सुरु

विज्ञानाचा दैनंदिन वापर अत्यावश्यक
राजापूर : विज्ञानाने जगाकडे कसे पाहावे, याची दृष्टी आपल्याला दिली असल्याने त्याचा वापर दैनंदिन जीवनात होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वागण्यात तसा बदल केल्यास खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन होईल, असा आशावाद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या व नरेंद्र दाभोलकर यांच्या सुकन्या मुक्ता दाभोलकर यांनी पाचल येथे व्यक्त केला.
पाचलमध्ये दिवंगत स्वातंत्र्यसैनिक गो. बा. तथा आबा नारकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलनावर पाचलमधील ग्रामसचिवालयाच्या सभागृहात कार्यशाळा व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
समाज परिवर्तनाच्या चळवळीशी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. त्यातूनच अंश्रद्धा निर्मूलनासाठी व्यापक समाज परिवर्तन घडवता येईल. त्यामुळे जगाचे निश्चितच कल्याण होईल, असे सांगून मुक्ता दाभोलकर यांनी विज्ञानावर मत मांडले.
आपण विज्ञानाची सृष्टी घेतली, पण दृष्टी घेतली नाही. एकीकडे मंगळावर जाण्याची तयारी चालवली जाते, तर दुसरीकडे मंगळ असलेल्या मुलीच्या विवाहात समाजाकडून असलेला विरोध घालवण्यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भारतीय संविधानाला प्रमाण मानून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य सुरु आहे. सर्व जाती धर्मांचा आपण आदर करत आलो आहोत. तथापि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अघोरी प्रथा व अनिष्ठ रुढी, परंपरा यांना आळा बसावा, यासाठी समितीने लढा उभारताच जादुटोणा कायदा अस्तित्त्वात आला. त्यातूनच वर्षभरात सहा नरबळी टळले, ही डॉ. दाभोलकरांना श्रद्धांजली ठरली आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
या कार्यशाळेदरम्यान सर्पांविषयी वाटणारी भीती कशी अनाठायी आहे. त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. पाचल परिसरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयप्रकाश नारकर होते. या कार्यक्रमाला पाचल गावच्या सरपंच अपेक्षा मासये, स्नेहा नेने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दाभोलकर म्हणतात...,
व्यापक समाज परिवर्तनासाठी अंधश्रध्दा निर्मूलन आवश्यक.
विज्ञानाची आपण सृष्टी घेतली, पण दृष्टी घेतली नाही.
वागण्यात बदल केल्यास खऱ्या अर्थाने अंधश्रध्दा निर्मूलन होईल.