रेल्वेस्थानकावर काँग्रेसचा घेराओ
By Admin | Updated: January 13, 2015 00:09 IST2015-01-12T22:46:48+5:302015-01-13T00:09:26+5:30
फलकावर नावच नाही : १९ जानेवारीपर्यंत मुदत

रेल्वेस्थानकावर काँग्रेसचा घेराओ
कणकवली : येथील रेल्वेस्थानकावर रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या विविध सुविधांचा प्रारंभ कार्यक्रमाच्या नामफलकावर आमदार नीतेश राणे यांच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. सोमवारी नीतेश यांच्या समर्थकांनी रेल्वेस्थानक परिसरातील रेल्वेमंत्र्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना घेराओ घालून १९ जानेवारीपर्यंत नावाचा उल्लेख न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. रेल्वेस्थानकातील रेल्वेमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील अधिकारी सुरेश बांबुळकर यांना कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी भेटून याबाबत जाब विचारला. येथील रेल्वेस्थानकात रविवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत सीसीटीव्ही, वाढीव प्रवासी सुविधांतर्गत सरकत्या जिन्याच्या कामांचा प्रारंभ झाला. राजशिष्टाचारानुसार या कार्यक्रमाच्या नामफलकावर स्थानिक लोकप्रतिनिधींचे नाव टाकणे आवश्यक असताना ते जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात सावंत यांनी सबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी आमदार राणे मराठवाड्यात असल्याचे समजल्यामुळे त्यांचे नाव टाकले नसल्याचा खुलासा केला. मात्र, आमदार विजय सावंत हेही कणकवलीत नव्हते मग त्यांचे नाव का टाकण्यात आले? असे सवाल सावंत यांनी केला असता, त्याबाबत अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही. यासंदर्भात जनरल मॅनेजरना विचारावे, लागेल, असे बांबुळकर यांनी सांगिताच त्यांना येथे बोलवा, असे सतीश सावंत यांनी सुनावले. स्थानिक आमदाराचे नाव टाकण्याचे सौजन्य कोकण रेल्वेकडून हेतुपुरस्सर टाळण्यात आल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. रेल्वेने याचे कारण जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, रेल्वे प्रशासनातर्फे रविवारी रात्रीच हा नामफलक काढून टाकल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे. १९ जानेवारीपर्यंत नामफलकावर आमदार राणे यांचा नामोल्लेख न झाल्यास कॉँग्रेस रेल्वेस्थानकावर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही एका निवेदनाद्वारे दिले आहे. (प्रतिनिधी)
नामफलक हटविला
आमदार नितेश राणे यांचे नाव न टाकण्यावरून वाद झाल्याने रेल्वेस्थानक परिसरात उभारलेला हा नामफलक सोमवारी रेल्वे प्रशासनाने तातडीने हटविला. दरम्यान, हा फलक रेल्वेप्रशासनाने रविवारी रात्रीच त्यांच्या गोदामात नेउन टाकल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
राजशिष्टाचारानुसार या कार्यक्रमाच्या नामफलकावर स्थानिक लोकप्रतिनिधींचे नाव टाकणे आवश्यक असताना ते जाणीवपूर्वक टाळले आहे.तसेच रेल्वेमंत्र्यांच्याच नावाचे नामफलक अडगळीत टाकणे हाही रेल्वेमंत्र्यांचा अपमान आहे.
- सतिश सावंत, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस