आचऱ्यातील संघर्ष; २५0 जणांवर गुन्हे
By Admin | Updated: November 2, 2015 00:28 IST2015-11-01T22:39:34+5:302015-11-02T00:28:14+5:30
पाच अटकेत : राज्य राखीव दल तैनात

आचऱ्यातील संघर्ष; २५0 जणांवर गुन्हे
मालवण : आचरा बंदरात स्थानिक मिनीपर्ससीन व पारंपरिक मच्छिमार यांच्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार चकमकीत आचरा पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे, तर अन्य २०० ते २५० मच्छिमारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अन्य संशयित मच्छिमारांचा शोध सुरू असून, काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आचरा येथे राज्य राखीव पोलीस बल, राखीव सुरक्षा दल यांच्या सशस्त्र पोलीस तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, दुसऱ्या दिवशीही तणावपूर्ण वातावरण होते.
दरम्यान, रिहान युसूफ मुजावर (आचरा-जामडूलवाडी) यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, गैरकायदा जमाव करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा करून गंभीर दुखापतीस कारणीभूत तसेच घरात घुसून मारहाण व तोडफोड करीत किनाऱ्यावरील बोटी, जाळी पेटवून दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यात शनिवारी रात्री उशिरा हर्षद चोडणेकर (वय २७, तोंडवळी), परशुराम प्रभू (३३, तोंडवळी), धनाजी कुमठेकर (४१, आचरा पिरावाडी), अमित हुर्णेकर (४०, वायरी-मालवण), अशोक कांदळगावकर (५०, आचरा पिरावाडी) यांना अटक केली आहे.
रिहान मुजावर यांनी दिलेल्या तक्रारीत शनिवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान, पारंपरिक मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी जमाव केला. यावेळी पारंपरिक मच्छिमार व पर्ससीन (पान ९ वर)
मासेमारी वादाच्या कारणावरून जीवघेणा संघर्ष घडला. जमावाने दांडे, लोखंडी शिगा, बर्फ भरायचे लोखंडी खोरे, दगड, आदींनी हल्ला केला. यात सकलीन मुजावर, अबुवकर मुजावर, शाईन मुजावर, इम्रान काझी व महिला, कामगार जखमी झाले, तर ‘राडा’ रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही जमावाने जखमी केले.
किनाऱ्यावरील महेश तोडणकर, आसिफ मुजावर यांची बोट, जाळी, फिश फायंडर, आदी मासेमारी साहित्य पेट्रोल टाकून या जमावाने पेटवून दिले. मासे उतरणी केंद्र्रावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान करीत इम्रान काझी, अनंत तारी यांच्या घरात घुसून घरातील सदस्यांना मारहाण व साहित्याची तोडफोड केली. अर्ध्या तासाच्या या चकमकीत सुमारे ५० लाखांहून अधिक किमतीचे नुकसान झाले असल्याचे मुजावर यांनी तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)
नुकसानीचा पंचनामा
आचरा पोलिसांनी नारायण कुबल, छोटू सावजी, दिलीप घारे, बाबी जोगी, धर्माजी आडकर यांच्यासह २०० ते २५० जणांच्या जमावाविरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा व गंभीर दुखापतीस कारणीभूत, घरात घुसून मारहाण, तोडफोड, जाळपोळ व दगडफेक केल्याप्रकरणी तसेच ५० लाख रुपये किमतीच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र्र शिंदे अधिक तपास करीत आहेत. रविवारी हल्ल्याच्या ठिकाणी नुकसानीचा पंचनामा पोलिसांकडून करण्यात आला.