७० टक्के भातकापणी पूर्ण

By Admin | Updated: November 11, 2015 23:49 IST2015-11-11T21:11:34+5:302015-11-11T23:49:08+5:30

नातू यांची माहिती : जिल्ह्यातील ४४ हजार हेक्टर क्षेत्रात प्रतिहेक्टरी ४४ क्विंटल उत्पन्न

Complete 70 percent weight gain | ७० टक्के भातकापणी पूर्ण

७० टक्के भातकापणी पूर्ण

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील म्हणजेच ७० टक्के भातकापणी पूर्ण केली आहे. पीककापणी प्रयोगाआधारे भातपिकाच्या उत्पन्नाचा विचार केल्यास प्रतिहेक्टरी ४४ क्विंटल एवढे उत्पन्न असल्याची माहिती राज्य माध्यमिक कृषी विभागातील सांखिक अधिकारी अरुण नातू यांनी दिली.
जिल्ह्यात ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली होती. त्यापैकी नोव्हेंबरअखेर ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील भातकापणी पूर्ण झाली आहे. त्याची टक्केवारी ७० टक्के एवढी आहे. गणेशोत्सवला, घटस्थापनेला पडलेला पाऊस गरव्या भात जातींना उपयुक्त ठरला. तसेच नाचणी पिकाच्या कापण्यादेखील ४० ते ५० टक्के झाल्या आहेत. काही ठिकाणी भातामध्ये पळींज (पोल) भात आढळल्याने त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल, जिल्हा परिषद कृषी व राज्य अधीक्षक कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा भात कापणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. पीक कापणीआधारे ज्या ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील भातकापणी पूर्ण झाली आहे. त्यात भाताचे उत्पन्न ४४ क्विंटल प्रतिहेक्टर एवढे आहे. त्यात वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या ते शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून समाधानकारक आहे. (प्रतिनिधी)

विश्वास : उर्वरित कापणी २५ पर्यंत पूर्ण होणार
परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या भातकापणीची कामे खोळंबली आहेत. काही जणांनी भातकापणी पूर्ण करून गंजीदेखील उभारल्या आहेत. उर्वरित ३० टक्के भात कापणी क्षेत्र नोव्हेंबर २२ ते २५ तारखेपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे. एकेक ाळी भात पिकाखालील क्षेत्र ८० ते ८५ हजार हेक्टर होते. आता कमी कमी होत ६३ हजार हेक्टरवर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Complete 70 percent weight gain