केरळीयनांची खरेदीखते तपासा
By Admin | Updated: August 24, 2015 23:21 IST2015-08-24T23:20:50+5:302015-08-24T23:21:07+5:30
दत्ताराम गावकर : जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा

केरळीयनांची खरेदीखते तपासा
कसई दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात केरळीयन लोकांनी बेकायदेशीर वनक्षेत्रात वास्तव्य वाढवले आहे. अनेकांनी हजारो हेक्टर क्षेत्रात जंगलतोड करून बोगस खरेदीखते, शेतकरी दाखले व महसूल अधिकारी यांच्या संगनमताने केलेली आहेत, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी निवेदनाद्वारे या संपूर्ण व्यवहारांची गोपनीय चौकशी करावी व दोषींवर तत्काळ कारवाई करावी. अन्यथा संपूर्ण शासन प्रणाली विरोधात न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्याचा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर यांच्यासह मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष श्रेया देसाई, महिला तालुकाध्यक्षा छाया परब, असंख्य मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रोळी मंदिर ते तहसीलदार कार्यालय असे पायी चालत अनेक घोेषणा देत दोडामार्ग बाजारपेठेतून हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर काढला. यावेळी पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
निवेदनातून तालुक्यातील के रळीयन परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केलेल्या आहेत. या जमिनी शेतकऱ्यांबरोबर शासनाच्या जमिनीवरही या लोकांनी अतिक्रमण केले आहे.
या केरळीयन लोकांकडून तालुक्यात मारामारी, खून आदी प्रकरणे होत असल्याने तालुक्याची बदनामी होत आहे. यावर पोलिसांनी आळा घालावा, या मागणीबरोबर वाढीव घरपट्टी, बोगस ओळखपत्रे, रेशनकार्ड, बेकायदेशीर फार्म हाऊस, रबर बोर्डाकडून फसवणूक करून केरळीयन लोकांनी कोट्यवधीची माया गोळा केली आहे. अवैध गौण खनिज सुरू आहे. अवैध धंदे सुरू आहेत, कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाईचा निधी उपलब्ध असूनही वाटप केले नाही, वाढीव घरपट्टी रद्द करावी, तालुक्यात केलेले सर्व रस्त्यांचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे, केर भेकुर्ली पंतप्रधान ग्रामसडक योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला या सर्व मागण्यांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली. तहसीलदार उपस्थित नसल्याने यावेळी उपस्थित असलेले नायब तहसीलदार पी. जी. केरकर यांनी हे निवेदन स्वीकारले. हे निवेदन आपण वरिष्ठांकडे पाठवू, असे आश्वासन केरकर यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले.
तालुक्यातील विविध प्रश्नांंसंदर्भात मनसेच्या दृष्टीने मोर्चा काढला. यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत आईर हे न आल्याने त्यांच्या अनुपस्थितीबाबत यावेळी दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा कार्यकर्त्यात सुरू होती.