स्वयंपूर्णतेसाठी व्यवसाय शिक्षण हवे : गीते
By Admin | Updated: February 2, 2015 00:06 IST2015-02-01T21:11:16+5:302015-02-02T00:06:27+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा आढावा घेतांना जिल्ह्यात क्षयरोगाला आळा घालण्यासाठी अधिक व्यापक प्रयत्नाची गरज आहे

स्वयंपूर्णतेसाठी व्यवसाय शिक्षण हवे : गीते
रत्नागिरी : जिल्ह्यात बचतगटांची चळवळ चांगल्या पद्धतीने रुजत आहे. या चळवळीच्या माध्यमातून नवीन बचतगट निर्माण करण्याबरोबरच त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी व्यवसाय शिक्षणाची संधी उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हास्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय काळम पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
बचतगटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठीचे प्रयत्न अधिक गतिमान करायला हवेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बचत गट उत्पादनांचे विक्री केंद्र उभारावेत. तसेच रेल्वे स्टेशनवर ही उत्पादने विक्री करण्यासाठी स्टॉल उभारण्याबाबत संबधितांकडे प्रस्ताव सादर करावेत, असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे भाग २च्या, टप्पा १मधील प्रगतीपथावरील कामे वेगाने पूर्ण करावीत. तसेच टप्पा दोनसाठी नवीन प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी, त्यांनी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, निर्मल भारत अभियान, इंदिरा आवास योजनांसह इतर योजनांचा आढावा घेतला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा आढावा घेतांना जिल्ह्यात क्षयरोगाला आळा घालण्यासाठी अधिक व्यापक प्रयत्नाची गरज आहे. तसेच कुष्ठरोग निवारणासाठीदेखील विशेष कार्यवाही करण्याच्या सूचना गीते यांनी दिल्या. स्थानिक विकास कार्यक्रमाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. (प्रतिनिधी)