पंचक्रोशीवर आधारित पर्यटन आराखडा तयार करा

By Admin | Updated: November 1, 2015 00:13 IST2015-10-31T22:21:11+5:302015-11-01T00:13:14+5:30

दीपक केसरकर : ओरोस येथे ग्राम पर्यटनाबाबतच्या बैठकीत मार्गदर्शन

Build a Panchkrishi based tourism plan | पंचक्रोशीवर आधारित पर्यटन आराखडा तयार करा

पंचक्रोशीवर आधारित पर्यटन आराखडा तयार करा

सिंधुदुर्गनगरी : ग्राम पर्यटनाच्या दृष्टीने शासनाच्यावतीने संपूर्ण कोकणाकरिता ४५ कोटींची तरतूद करण्यात आली असून यामध्ये पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गचा महत्वाचा वाटा आहे. त्या अनुषंगाने या जिल्ह्यातील ग्राम पर्यटनाच्या विकासाकरिता पंचक्रोशींवर आधारित पर्यटन विकास आराखडा तयार करा, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. शरदचंद्र पवार भवन, ओरोस येथे आयोजित व्हिलेज टुरिझम व ग्राम पर्यटनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेचे डॉ. साळवी, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे डॉ. मुणगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, पर्यटनातून प्रत्येक घरी विकास पोहचला पाहिजे. यासाठी पर्यटनावर आधारित कामांचा प्रामुख्याने विचार होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतींनी आपली बलस्थाने ओळखून त्या धर्तीवर पर्यटन विकास आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन स्थळे, वर्षा पर्यटन स्थळे, थंड हवेची ठिकाणे या सर्व पर्यटनस्थळांची एकमेकांशी सांगड घालणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील खाद्यसंस्कृती, जंगलसफर, लोककला व जैवविविधता यावर आधारित पर्यटन विकासाचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. तरी ग्रामस्थांनी आपल्या पंचक्रोशीत असलेल्या पर्यटनस्थळांवर तसेच पर्यटकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयीसुविधांवर आधारित आराखड्याचे नियोजन करावे.
आमदार वैभव नाईक म्हणाले, केवळ रस्ते तयार केल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल असे नाही तर पर्यटनाच्या संपूर्ण विकासाकरिता पर्यटनाला चालना देणाऱ्या बाबींचे योग्य नियोजन करणे आवश्यक असून, उत्तम नियोजन असेल तर कमी पैशातही आपल्या पंचक्रोशीच्या पर्यटनाचा विकास होऊ शकेल.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरपूर प्रमाणात जैववैविधता असून पर्यटन विकास आराखडा तयार करताना जैववैविधता संवर्धनाच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत पातळीवर जैववैविधतेची समिती गठीत करून त्या- त्या पंचक्रोशीतील दुर्मीळ प्राणी, वनस्पती, पक्षी यांच्या नोंदी घेणे आवश्यक असून जैववैविधतेच्या अनुषंगाने पर्यटकांना आकर्षित करून पर्यटनाला चालना मिळू शकेल. तसेच ग्रामपंचायतींनी भौगोलिक परिस्थितीवर आधारित पर्यटन विकास आराखडा तयार करावा, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेचे डॉ. साळवी, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे डॉ. मुणगेकर यांनी आपले विचार मांडले. (प्रतिनिधी)
नवाबागची फिशर पर्यटन व्हिलेज म्हणून निवड
जिल्ह्यातील गावांचा पर्यटनावर आधारित विकास करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नवाबाग या गावाची पर्यटन फिशर व्हिलेज म्हणून निवड करण्यात आली आहे. या गावामध्ये पर्यटन फिशर व्हिलेज म्हणून विकास करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.
धनगर समाजाच्या समस्या सोडविणार : पालकमंत्री
जिल्ह्यातील धनगर समाजाच्या मागण्या लक्षात घेता प्रशासनाने या समाज बांधवांना शासकीय योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी एक मास्टर प्लॅन बनवावा, त्यानुसार घेण्यात येणाऱ्या योजना याची माहिती सादर करावी, वाडीनिहाय घेण्यात येणाऱ्या जनसुविधांची यादी बनवावी व त्यानुसार समाज कल्याण विभागाने या कामाला प्राधान्य देऊन आराखडा सादर करावा.

Web Title: Build a Panchkrishi based tourism plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.