बॉर्डर परिषद पुन्हा सुरू करणार
By Admin | Updated: February 1, 2015 00:35 IST2015-02-01T00:35:36+5:302015-02-01T00:35:36+5:30
राम शिंदे : अधिकारी बदलला तरी मोबाईल नंबर तोच हवा

बॉर्डर परिषद पुन्हा सुरू करणार
सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या सीमेवर असलेल्या कर्नाटक गोवा व महाराष्ट्र या तीन राज्यांची बंद झालेली बॉर्डर परिषद लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. सावंतवाडीत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.
माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, किर्ती बोंद्रे, अफरोझ राजगुरू, शब्बीर मणियार, आदी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री शिंदे म्हणाले, अधिकारी बदलला तरी त्यांचा मोबाईल नंबर तोच राहिला पाहिजे यासाठी गृहविभाग लवकरच एक प्रस्ताव तयार करणार आहे. याचा फायदा सर्वसामान्य माणसाला
होणार आहे. अधिकारी बदलला की त्याचा नंबर बदलतो. त्यामुळे अनेकवेळा तक्रारदारांना येणाऱ्या अधिकाऱ्यांचा नंबर शोधावा लागतो. हे कुठे तरी थांबले पाहिजे, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सीमेवरच्या राज्यातील गुन्हेगार सिंधुदुर्गचा आश्रय घेतात. तर या ठिकाणी कृत्य केलेले गुन्हेगार अवघ्या काही मिनिटात इतर राज्यात जाऊ शकतात. येथील पोलिसांना इतर राज्यातील पोलीस सहकार्य करीत नाही. त्यामुळे बोर्डर परिषद होणे गरजेचे आहे, असे गृहराज्यमंत्री शिंदे यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी याबाबत माहिती घेईन. ही परिषद का बंद झाली, याची कारणे शोधून लवकरात लवकर ही बोर्डर परिषद होणार असल्याचे यावेळी गृहमंत्र्यानी सांगितले.
तंटामुक्ती ही संकल्पना मागच्या सरकारने राबवली असून, या संकल्पनेबाबत नवीन आलेले सरकार विचारविनिमय करीत असून, ही तंटामुक्ती तशीच ठेवायची की त्यांचे नाव बदलायचे आणि त्यात बदल करायचा यांचा निर्णयही घेतला जाईल, असे ही गृहराज्यमंत्र्यानी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)